- Home
- Utility News
- Indian Railways Free AC Travel : 1 नोव्हेंबरपासून नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार मोफत एसी प्रवास
Indian Railways Free AC Travel : 1 नोव्हेंबरपासून नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार मोफत एसी प्रवास
संरक्षण मंत्रालयाने भारतीय जवानांना एक मोठी भेट दिली आहे. १ नोव्हेंबरपासून शौर्य पुरस्कार विजेत्यांना ट्रेनमध्ये फर्स्ट आणि सेकंड एसीचे तिकीट मोफत मिळणार आहे. या नव्या नियमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

१ नोव्हेंबरपासून रेल्वेचे नवे नियम, आता ट्रेनमध्ये करा मोफत एसी प्रवास
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या आणि अफाट शौर्य गाजवणाऱ्या वीर जवानांना संरक्षण मंत्रालयाने एक खास भेट दिली आहे. सीमेवर अतुलनीय त्याग करणाऱ्या जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी केंद्राने हा मोठा निर्णय घेतला आहे.
सेना पदक, नौसेना पदक आणि वायुसेना पदक मिळवणाऱ्या शूरवीरांना आता भारतीय रेल्वेतून आयुष्यभर मोफत प्रवास करता येणार आहे. हे नवे नियम आणि डिजिटल सेवा या वर्षी १ नोव्हेंबरपासून लागू होतील. सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आणि पूर्णपणे डिजिटल केली आहे.

मोफत एसी प्रवासाचा लाभ कोणाला मिळणार?
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना भारतीय रेल्वेच्या फर्स्ट क्लास एसी, सेकंड एसी आणि एसी चेअर कारमधून मोफत प्रवास करता येईल. ही लाइफटाइम फ्री ट्रॅव्हल सुविधा शौर्य पुरस्कार विजेत्यांसोबतच त्यांच्या जोडीदारालाही (पती किंवा पत्नी) आयुष्यभर मिळेल. जर पुरस्कार विजेत्याचे निधन झाले, तर त्यांच्या जोडीदाराने दुसरे लग्न करेपर्यंत ही सुविधा लागू राहील. याशिवाय, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अविवाहित शहिदांच्या पालकांनाही सरकारने या योजनेत लाभार्थी म्हणून समाविष्ट केले आहे.
संपूर्ण प्रक्रिया आता डिजिटल आणि पेपरलेस
संरक्षण मंत्रालयाने या सुविधेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि पारदर्शक बनवली आहे. यासाठी लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात खेटे मारण्याची गरज नाही. पात्र उमेदवारांना भारतीय रेल्वेच्या कन्सेशन कार्ड पोर्टलवर जाऊन मोफत ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. पोर्टलवर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होताच, उमेदवारांना ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल पास दिला जाईल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि कागदपत्रांचा झंझटही राहणार नाही.
१ नोव्हेंबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू
डिजिटल ट्रॅव्हल पास मिळाल्यानंतर पात्र लाभार्थी आपले रेल्वे तिकीट अगदी सहज बुक करू शकतात. इलेक्ट्रॉनिक पासच्या आधारे तिकीट बुक करण्याची ऑनलाइन सुविधा १ नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वेच्या आयआरसीसीपी (IRCCP) वेब पोर्टलवर उपलब्ध होईल. या पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस सिस्टीममुळे वेळेची बचत होईल. जवानांना आता कार्यालयांच्या चकरा माराव्या लागणार नाहीत, ते घरबसल्या कोणत्याही कागदपत्रांशिवाय काही सेकंदात मोफत रेल्वे तिकीट मिळवू शकतील.
जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा योग्य सन्मान
जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सरकार किती कटिबद्ध आहे, हे या निर्णयावरून दिसून येते, असे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत प्राणांची बाजी लावून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सरकारने उचललेले हे ऐतिहासिक पाऊल सध्या कार्यरत असलेल्या आणि निवृत्त जवानांचे मनोबल नक्कीच वाढवेल. तसेच, येणाऱ्या पिढीला आणि आजच्या तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी ही एक मोठी प्रेरणा ठरेल.
