Railway Station : देशातलं एकमेव स्टेशन, जिथे ट्रेन पकडायला लागतो पासपोर्ट-व्हिसा
विमानाने परदेशात जायचं असेल तर पासपोर्ट आणि व्हिसा लागतो, हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याच देशात एका ट्रेनने प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाची गरज लागते, हे तुम्हाला माहीत आहे का?

एक विचित्र रेल्वे स्टेशन
आपल्या देशात ट्रेनने प्रवास करायचा म्हणजे फक्त तिकीट काढलं की झालं. पण भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे, जिथे तुम्हाला ट्रेन पकडण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा लागतो. देशांतर्गत विमान प्रवासालाही याची गरज नसते. मग असं कोणतं स्टेशन आहे जिथे हा विचित्र नियम आहे?

कोणतं स्टेशन? कुठे आहे?
हे खास स्टेशन आहे पंजाब राज्यात, भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेलं 'अटारी श्री गुरु रामदास जी रेल्वे स्टेशन' (Attari Railway Station). भारत आणि पाकिस्तानला जोडणारी ऐतिहासिक 'समझौता एक्सप्रेस' याच स्टेशनवरून जाते.
का आहेत इतके कडक नियम?
पासपोर्ट आणि व्हिसा अनिवार्य: हे स्टेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळासारखंच आहे. इथे सुरक्षा आणि तपासणीची कडक व्यवस्था आहे. सीमेपलीकडे प्रवास असल्यामुळे, प्रवाशांकडे पासपोर्ट आणि व्हिसा असल्याशिवाय स्टेशन परिसरात प्रवेश मिळत नाही.
हा नियम फक्त पाकिस्तानी नागरिकांसाठी आहे, असं समजू नका. भारतीय नागरिकांसाठीही नियम तितकेच कडक आहेत. जर कोणताही भारतीय नागरिक परवानगीशिवाय किंवा पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय स्टेशनमध्ये शिरला, तर तो गंभीर गुन्हा मानला जातो. अशा व्यक्तींवर फॉरेनर्स ऍक्टच्या कलम १४ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
कस्टम्स आणि इमिग्रेशन तपासणी: स्टेशनमध्येच कस्टम क्लिअरन्स आणि इमिग्रेशन काउंटर आहेत. ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांच्या सामानाची आणि कागदपत्रांची कसून तपासणी केली जाते.
सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) कडक निगराणीखाली असलेलं हे अटारी रेल्वे स्टेशन भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक विचित्र आणि अविस्मरणीय ठिकाण आहे.
