उत्तराखंडच्या कोटा गावातल्या लोकांनी हिन्वाळ नदीवर स्वतःच एक लाकडी पूल बांधला आहे. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे रस्ता ओलांडताना त्यांना खूप त्रास होत होता. गावकऱ्यांनी लाकडी ओंडके आणि फळ्या टाकून हा पूल तयार केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

उत्तराखंड: उत्तराखंडमधल्या कोटा गावातल्या गावकऱ्यांनी हिन्वाळ नदीवर चक्क स्वतःचा असा एक लाकडी पूल बांधला आहे. नदीचा प्रवाह खूप वेगवान असल्यामुळे पायी नदी ओलांडताना त्यांना खूप कसरत करावी लागत होती. आता या गावकऱ्यांनी एकत्र येत पूल बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण लाकडी ओंडके आणि फळ्या वापरून हा पूल तयार करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यावर हा पूल बांधण्यात आला. हे ठिकाण ग्रामसभा कोटा असल्याचं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे.

गावकऱ्यांनी लाकडी ओंडक्यांचा वापर करून बांधला पूल

या व्हिडिओमध्ये काही माणसं नदीच्या पात्रावर तीन मोठे लाकडी ओंडके ठेवताना दिसत आहेत. त्यानंतर त्यावर लाकडी फळ्या ठोकून त्यांनी हा साधा पण गरजेचा पूल ये-जा करण्यासाठी तयार केला.

View post on Instagram
 

याआधीही याच भागातला एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात गावकरी चक्क दोरीच्या साहाय्याने नदी ओलांडताना दिसले होते. नदीच्या दोन्ही तीरांवर काही लोक दोरी घट्ट धरून उभे होते आणि बाकीचे जीव मुठीत धरून पाण्यातून रस्ता काढत होते.

View post on Instagram
 

पक्का पूल नसल्यामुळे कोटा आणि जवळच्या उमरीसेन गावातल्या लोकांना रोजच्या प्रवासात खूप अडचणी येतात. विशेषतः जेव्हा नदीला पूर येतो, तेव्हा परिस्थिती आणखीनच भयानक असते.

आता हा नवीन व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आला आहे. रोजच्या समस्येवर गावकऱ्यांनी एकत्र येऊन जो मार्ग काढलाय, त्याचं अनेक युजर्स भरभरून कौतुक करत आहेत.

'आत्मनिर्भर भारत' 

सोशल मीडियावर काही युजर्सनी गावकऱ्यांच्या या प्रयत्नाला 'आत्मनिर्भरतेचं' उत्तम उदाहरण म्हटलं आहे. तर एकाने कमेंट केलीय की, "जेव्हा लोक दुसऱ्याच्या मदतीची वाट न बघता स्वतः पुढाकार घेतात, तेव्हा ते काहीही करू शकतात."

दुसरीकडे, गावकऱ्यांच्या या हालाखीच्या परिस्थितीवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे आहेत? असा सवाल करत लोकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका केली आहे.

एका युजरने या परिस्थितीला "कठोर जीवन" म्हटलंय, तर दुसऱ्याने "आत्मनिर्भर भारत" अशी कमेंट केली आहे.

या व्हायरल व्हिडिओमुळे आता दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे गावकऱ्यांच्या जिद्दीला सलाम केला जातोय, तर दुसरीकडे पक्का पूल नसल्याने संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी तर थेट उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर टॅग करून जाब विचारला आहे.

गावकऱ्यांनी बांधलेला हा पूल म्हणजे सुरक्षित आणि पक्क्या पुलाला पर्याय नाही, तर तो फक्त एक तात्पुरता जुगाड आहे. पण जसजसा हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत, तसतशी गावकऱ्यांना आता एका भक्कम आणि पक्क्या पुलाची आशा नक्कीच वाटू लागली आहे.