युरोपला परतल्यानंतर रोक्झॅन नावाच्या एका तरुणीने भारतातल्या ११ गोष्टींची यादी शेअर केली आहे. तिला इथले रंग, लोकांचा एकत्र राहण्याचा स्वभाव आणि रोजच्या जगण्यातली आध्यात्मिकता खूप भावली असून, या गोष्टींची तिला युरोपमध्ये उणीव भासत आहे.

भारतातून युरोपला परतल्यावर एका तरुणीला इथल्या छोट्या-छोट्या गोष्टींची खूप आठवण येत आहे. रोक्झॅन असं या युरोपियन तरुणीचं नाव आहे. युरोपला परतल्यानंतर तिने भारतातल्या अशा ११ गोष्टींची यादीच बनवली आहे, ज्यांची तिला तिथे उणीव भासतेय. यात इथले रंग, लोकांचा मनमिळाऊ स्वभाव, अचानक कोणीही दिलेली स्माईल आणि चहावरच्या गप्पांचा समावेश आहे.

तिच्या मते, कोणती संस्कृती श्रेष्ठ आहे हे ठरवणं हा यामागचा उद्देश नाही. तर रोजचं जगणं किती वेगळं असू शकतं, हे तिला सांगायचं आहे. युरोपियन लोकांनी भारतीयांकडून या ११ गोष्टी शिकल्या पाहिजेत, असं तिला वाटतं.

रोक्झॅनने सगळ्यात आधी एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे लोक विनाकारण एकमेकांकडे बघून हसतात. आणि हे हसणं अजिबात खोटं वाटत नाही, ही गोष्ट तिच्या लक्षात राहिली. तिला इथल्या लोकांचा बाहेर वेळ घालवण्याचा आणि आजूबाजूच्या जगाचं निरीक्षण करण्याचा स्वभाव खूप आवडला. शेजाऱ्यांसोबत चहा पिताना मारलेल्या गप्पा, प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसलेले काका आणि नुसतंच वेळ घालवणारे लोक, या सगळ्याची तिला खूप आठवण येतेय.

रोक्झॅनच्या मते, भारतात आध्यात्मिकता लोकांच्या रोजच्या जगण्यात भिनलेली आहे. याचा अर्थ फक्त 'आध्यात्मिक' असणं किंवा कडक धार्मिक नियम पाळणं असा होत नाही.

ती म्हणते की, कोणतीही साधना करणं, नामस्मरण करणं किंवा कुणी काय म्हणेल याचा विचार न करता फक्त वर्तमानात जगणं, हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकार असू शकतो. तिला इथल्या खाद्यसंस्कृतीनेही भुरळ घातली. लोक एकमेकांना भेटल्यावर "कसे आहात?" विचारण्याऐवजी "जेवण झालं का?" असं विचारतात, हे तिला खूप भावलं. तिला स्वतःला खायला खूप आवडत असल्यामुळे ही गोष्ट तिला जास्त रिलेट झाली.

तिने भात, डाळ, दही, पनीर, डोसा, भाज्या आणि नारळ या पदार्थांचा खास उल्लेख केला आहे. इथल्या चवी आणि पदार्थांमधलं वैविध्य तिला खूप आवडलं.

ती पुढे सांगते की, भारतात असताना तिची पचनक्रिया आजवरची सर्वात उत्तम होती. इथल्या लोकांच्या एकजुटीचाही तिच्यावर खूप प्रभाव पडला. युरोपमध्ये लोक खूप स्वतंत्र असतात आणि स्वतःची कामं स्वतः करण्यावर त्यांचा भर असतो. पण भारतात मात्र लोक एकमेकांना धरून राहतात, हे तिला खूप वेगळं वाटलं.

मित्र, शेजारी, नातेवाईक आणि अगदी अनोळखी लोकही मदतीला नेहमी तयार असतात, हे तिने अनुभवलं.

रोक्झॅनला आणखी एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं, जी आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात हरवत चालली आहे. ती म्हणजे नुसतंच बसून राहणं, गप्पा मारणं आणि काहीही न करणं. "मला वाटतं आपण हे सगळं करायला विसरलो आहोत," असं तिने लिहिलं आहे. याशिवाय तिला इथल्या रंगांचीही भुरळ पडली. युरोपला परतल्यावर तिला इथले चमकदार कपडे, दागिने, फुलं, साड्या आणि बांगड्या यांची खूप आठवण येतेय. तिचं निरीक्षण अगदी साधं होतं: युरोप आता हळूहळू राखाडी, काळा आणि फिकट रंगांचा होत चालला आहे.

हा व्हायरल व्हिडिओ पाहा

View post on Instagram
 

शेवटी, तिने एक अतिशय ठाम मत मांडलं: "टॉयलेट पेपरपेक्षा पाणी कधीही चांगलं." थोडक्यात सांगायचं तर, तिची ही यादी युरोप आणि भारताची तुलना करणारी नाही. तर जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी खूप वेळ घालवता, तेव्हा तिथल्या छोट्या-छोट्या सवयी तुमच्या आयुष्याचा कसा भाग बनतात, हे सांगणारी आहे.

रोक्झॅनच्याच भाषेत सांगायचं तर, युरोपला परतल्यावर तिला जाणवलं की भारतातल्या या छोट्या-छोट्या गोष्टी तिच्या रोजच्या जगण्याचा कसा भाग बनल्या होत्या.