Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांनी त्यांचं अन्नत्याग उपोषण सुरूच राहणार असल्याचं सांगितलं आहे. आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सोमवारी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शांततापूर्वक सहभागी झालेल्या आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज, त्यांच्यावरील अन्याय पाहून आपण आपलं उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे, असं सोनम यांनी सोशल मीडियावरुन सांगितलं आहे.
सोनल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हाताने लिहिलेला मजकूर आहे. यात त्यांनी लिहिलंय, की 'शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांना ज्याप्रकारच्या क्रूरतेने वागवलं जात आहे कॉकरोच जनता पक्षाच्या नेत्यांना संसदेतील खासदारांना भेटण्यासाठी, संसदेत जाऊन खासदारांची भेट घेण्याची परवानगी दिली जात नाही, तसंच सीजेपीच्या कार्यकर्त्यांना सफरदरजंग रुग्णालयात मला भेटण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहिल', असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, 'आंदोलन करणाऱ्या तरुणांनी परिस्थिती कठीण असूनही, परिस्थिती प्रक्षोभक असून देखील शांतता राखली. त्यांनी अशा परिस्थितीत दाखवलेली शांतता पाहून मी भारावलो आहे. सरकारने विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या, तक्रारी संसदेत मांडण्यासाठी तरतूद करुन द्यावी आणि या समस्येचं निराकरण करावं. आंदोलक आजच्याप्रमाणेच संयम दाखवतील, अशी खात्री आहे'.
आज २० जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी कॉकरोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलं.
कॉकरोच जनता पार्टीकडून तीन महत्त्वाच्या मागण्या
सीजेपीकडून तीन महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. पहिली मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरी मागणी सोनम वांगचुक यांची रुग्णालयातून सुटका आणि तिसरी मागणी नीट परीक्षेप्रकरणी आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी.


