राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. सरकारकडे दिव्यांसाठी पैसे आहेत, पण विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी का नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला.
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सेलिब्रेशनचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधांवरून सरकारला घेरलं. सरकारकडे दिवे लावण्यासाठी पैसे आहेत, पण ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि आर्थिक मदतीसाठी पैसे नाहीत, असा आरोप या काँग्रेस खासदाराने केला.
'दिव्यांसाठी पैसे आहेत, पण आमच्या हॉस्टेलसाठी नाहीत'
इंदूरमध्ये 'छात्रों की गूंज' या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाचा संदर्भ राहुल गांधींनी दिला. एक्स (X) वर पोस्ट करत त्यांनी खेड्यातून शहरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणींच्या अडचणी मांडल्या. "'सरकारकडे दिवे लावण्यासाठी पैसे आहेत, मग आमच्या हॉस्टेलसाठी का नाहीत?' काल इंदूरमध्ये एका विद्यार्थिनीने मला हा प्रश्न विचारला. ती शिक्षणासाठी गावातून शहरात आली आहे. हॉस्टेल नसल्याने तिला पीजीमध्ये (पेईंग गेस्ट) राहावं लागतं. फक्त सुरक्षित राहण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. दर महिन्याला भाड्याची चिंता आणि बेघर होण्याची भीती, या सगळ्यात तिला अभ्यास करावा लागतो," असं गांधी म्हणाले.
पंतप्रधानांनी यावर उत्तर द्यावं अशी मागणी करत त्यांनी सांगितलं की, राहण्याची सोय आणि सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मुलींना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. "फक्त राहायला जागा नाही म्हणून अनेक मुलींचं शिक्षण सुटतं. आणि घरभाडे भत्त्याचं काय? महागाई वाढते तसा तो वाढत नाही, वरून त्यातही भ्रष्टाचार होतो. @narendramodi- तुमच्याकडे त्या लहान मुलीच्या प्रश्नाचं काही उत्तर आहे का?" असा थेट सवाल त्यांनी केला.
'सिस्टीमचा कब्जा' असल्याचा गांधींचा आरोप
याआधी शनिवारी राहुल गांधींनी एका शक्तिशाली 'सिस्टीम'वर (व्यवस्थेवर) सडकून टीका केली होती. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारू नयेत, अशी या सिस्टीमची इच्छा आहे. 'देशावर सिस्टीमचा कब्जा' या सादरीकरणातून त्यांनी विद्यार्थ्यांचा लढा नेमका कोणाविरुद्ध आहे, हे स्पष्ट केलं. भारतातील प्रमुख संस्थांवर राजकीय, प्रशासकीय, वैचारिक आणि कॉर्पोरेट हितसंबंधांचं जाळं पसरलं असून त्यांनी या संस्थांवर कब्जा केला आहे, असा आरोप गांधींनी केला.
पेपरफुटी, संस्थांचं कामकाज, अर्थव्यवस्थेतील खाजगी कंपन्यांची भूमिका आणि क्रिकेट प्रशासनात अमित शहा यांचा मुलगा जय शहा याची नियुक्ती, यांसारखे प्रश्न विद्यार्थी विचारू शकतात, असं ते म्हणाले. "अमित शहांचा मुलगा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कसा झाला, असा प्रश्न एक विद्यार्थी विचारतो. फक्त दोन व्यक्तींनी भारताच्या संपूर्ण उद्योग जगतावर कसा ताबा मिळवला, असा प्रश्न विद्यार्थी विचारतो. न्यायव्यवस्था आणि इतर संस्था आपलं काम का करत नाहीत, किंवा निवडणूक आयोग आपली जबाबदारी का पार पाडत नाही, असे प्रश्न विद्यार्थी विचारतात. म्हणूनच या सिस्टीमला विद्यार्थी नकोत, त्यांना 'अंधभक्त' हवे आहेत," असं ते म्हणाले.
विद्यार्थी विरुद्ध 'अंधभक्त'
गांधींनी 'अंधभक्त' म्हणत काहींवर निशाणा साधला आणि त्यांची तुलना प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांशी केली. "अंधभक्त कधीच प्रश्न विचारत नाही. विद्यार्थी तोच असतो जो आवाज उठवतो," असं गांधी म्हणाले. "अंधभक्त हा विद्यार्थ्याच्या अगदी विरुद्ध असतो. विद्यार्थी प्रश्न विचारतो आणि त्याच्यात जिज्ञासा असते, तर अंधभक्त स्वतःच्याच एका भ्रमाच्या जगात जगतो. विद्यार्थी निडर असतो, तर अंधभक्त भित्रा असतो," असंही त्यांनी पुढे जोडलं.

