लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे. RSS देशातील दीड अब्ज लोकांवर स्वतःच्या 'सत्या'ची आवृत्ती लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महात्मा गांधींच्या 'स्वराज्य' संकल्पनेचा संदर्भ देत, प्रत्येकाला आपापल्या सत्याचा मार्ग शोधण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार वैचारिक हल्ला चढवला. RSS देशातील दीड अब्ज लोकांवर स्वतःच्या 'सत्या'ची आवृत्ती लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नवी दिल्लीत 'हरा भरा स्वराज्य: अ ट्रिब्यूट टू राजीव गांधीज व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधींची 'स्वराज्य' संकल्पना आणि RSS ची विचारसरणी यातील फरक स्पष्ट केला.
राहुल गांधी म्हणाले, "गांधीजी सांगत होते की प्रत्येक जीव हा एक वेगळा घटक आहे आणि प्रत्येकाचा सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगळा असतो. तुमचं सत्य काय आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आज भारतात नेमकी हीच वैचारिक लढाई आहे. हा लढा पर्यावरण, राजकारण किंवा माध्यम स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही, ती तर केवळ लक्षणं आहेत. खरी लढाई ही आहे की, व्यवस्थेवर नियंत्रण मिळवल्यामुळे एका छोट्या गटाने ठरवून टाकलंय की, या देशातील प्रत्येकाचं सत्य काय आहे, हे त्यांनाच माहीत आहे. RSS बद्दल माझा नेमका हाच आक्षेप आहे. RSS ने ठरवलंय की त्यांना दीड अब्ज लोकांचं सत्य माहीत आहे. पण मी म्हणतो, नाही. फक्त ते दीड अब्ज लोकच त्यांचं सत्य जाणू शकतात."
ते पुढे म्हणाले, "मी सुद्धा हे करू शकत नाही. जर मला वाटायला लागलं की मला तुमचं सत्य माहीत आहे, तर मी वेडा ठरेन. कारण मी तुम्ही नाही. तुम्ही जे अनुभवलंय, ते मी अनुभवलेलं नाही; तुम्ही जे पाहिलंय, ते मी पाहिलेलं नाही. माझे आई-वडील, मित्र आणि आयुष्य तुमच्यासारखं नाही. मग मी कसं म्हणू शकेन की मला तुमचं सत्य माहीत आहे?"
महात्मा गांधींच्या आत्मचरित्राचं नाव 'माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ' (माझे सत्याचे प्रयोग) होतं, 'द ट्रुथ' (तेच सत्य) नव्हतं, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, "लक्षात घ्या, गांधीजींच्या पुस्तकाचं नाव 'द ट्रुथ' किंवा 'माझं सत्याबद्दलचं आकलन' असं नव्हतं. त्याचं नाव होतं 'माझे सत्याचे प्रयोग'. माझे माझ्या सत्यासोबत प्रयोग आहेत; तुमचे तुमच्या सत्यासोबत प्रयोग आहेत."
'भारत मातेला' इजा पोहोचवल्याचा आरोप
राहुल गांधी यांनी भाजप आणि RSS वर विविध समाजांमध्ये दुजाभाव निर्माण करत असल्याचा आरोप केला. अशा कृतींमुळे 'भारत माते'ला इजा पोहोचत आहे, असं ते म्हणाले. "कल्पना करा भाजप आणि RSS ने काय केलंय. समजा मी या खोलीत आलो आणि तुमच्यापैकी १५-१७ टक्के लोकांना - मुस्लिम, ख्रिश्चन, शीख - यांना सांगितलं की, 'तुमचं काही अस्तित्वच नाही आणि जर तुम्ही बोललात, तर काय होतं ते बघा.' मग १० टक्के आदिवासींना सांगितलं, 'आम्ही तुमची जमीन कधीही घेऊ आणि विरोध केल्यास गोळ्या घालू,' आणि दलितांना सांगितलं, 'तुम्ही उगाच तक्रार करत आहात, जातीय व्यवस्थेत सगळं ठीक आहे.' हेच आपल्या भारत मातेसोबत केलं जात आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला - धर्म, समाज किंवा लिंग काहीही असो - असं वाटलं पाहिजे की, 'मी इथलाच आहे. मी या देशात मोकळेपणाने फिरू शकतो. इथे मला प्रेम, आदर आणि सन्मान मिळतो आणि माझ्या सत्याच्या शोधाला या राष्ट्रात महत्त्व आहे'."
स्वराज्याची भारतीय संकल्पना
राहुल यांनी पाश्चात्य 'फ्रिडम' (Freedom) आणि भारतीय 'स्वराज्य' यातील मूळ फरक डोनाल्ड ट्रम्प आणि महात्मा गांधी यांची उदाहरणं देऊन स्पष्ट केला. "'स्वराज्य' या शब्दाचा अनेकदा पाश्चात्य शब्द 'फ्रिडम'सोबत गोंधळ होतो. लोकांना वाटतं की स्वराज्य म्हणजे फ्रिडम, म्हणजे स्वातंत्र्य किंवा मुक्ती. नाही - स्वराज्य म्हणजे स्वतःवरील राज्य. तुम्ही अमेरिकेत जाऊन विचारलं की, 'ट्रम्प एक स्वतंत्र व्यक्ती आहे का?', तर सगळे म्हणतील, 'अगदी नक्कीच.' पण जर तुम्ही विचारलं, 'ट्रम्पचं स्वतःवर राज्य आहे का?', तर याचं स्पष्ट उत्तर आहे, 'नाही, त्याचं नाही.' याउलट, ८० वर्षांपूर्वी तुरुंगात असलेले गांधीजी म्हणाले असते, 'मी स्वतंत्र नाही, पण माझं स्वतःवर राज्य आहे. हेच स्वराज्य आहे'."
त्यांनी पुढे सांगितलं, "स्वराज्य ही एक भारतीय संकल्पना आहे आणि त्यात एक मोठी जबाबदारी आहे. ही एक विचार करण्याची पद्धत आहे आणि हा एक वैयक्तिक प्रकल्प आहे. मी तुम्हाला स्वराज्य देऊ शकत नाही. पाश्चात्य अर्थाने, 'तुम्ही तुरुंगात नाही, मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं,' असं म्हणून मी तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकेन. पण मी तुम्हाला स्वराज्य देऊ शकत नाही. कारण स्वराज्य हे तुमचं विश्वाशी असलेलं वैयक्तिक नातं आहे. स्वराज्य हा एक वैयक्तिक मार्ग आहे. आणि गांधीजींची स्वराज्याची संकल्पना ही होती की या देशातील प्रत्येक व्यक्तीने या मार्गावर चालावं."


