बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. तिला ११वी नंतर शिक्षण अर्धवट सोडल्याचा आजही पश्चात्ताप होतो. आपल्या मुलांनी मात्र शिक्षण पूर्ण करावं, अशी तिची इच्छा आहे. जाणून घेऊया तिने नेमकं काय म्हटलं आहे.
मुंबई : करीना कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा लूक, अभिनय आणि चाहत्यांप्रति असलेलं प्रेम यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. करीना आपल्या कामाप्रती खूपच समर्पित आहे. लवकरच ती 'दायरा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन दिसणार असून, मेघना गुलजार यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.
नुकतंच करीनाने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एका मोठ्या खंतविषयी सांगितलं आहे. तिने ११वी नंतर आपलं शिक्षण सोडलं होतं आणि याचा तिला आजही पश्चात्ताप होतो. हो, हे खरं आहे. करीनाने फक्त ११वी पर्यंतच शिक्षण घेतलं आणि त्यानंतर तिने थेट चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र, आपल्या मुलांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करावं, अशी तिची तीव्र इच्छा आहे. याच कारणामुळे ती UNICEF सोबत मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी काम करत आहे.
शिक्षण अर्धवट सोडल्याची खंत
पॉडकास्टर हनुमान दास यांच्याशी बोलताना करीना म्हणाली, “मी माझं शिक्षण पूर्ण करू शकले नाही आणि ही गोष्ट माझ्या मनात कायम राहिली. संधी असूनही मी ११वी नंतर पुढे शिकले नाही आणि चित्रपटांमध्ये आले. अनेक जण याची खिल्ली उडवू शकतात किंवा काहीही म्हणू शकतात, पण मला स्वतःला एक अभिनेत्री म्हणून सिद्ध करायचं होतं. मला माझ्या मनाचं ऐकायचं होतं.”
ती पुढे म्हणाली, “शिक्षण पूर्ण न केल्याची खंत मला नेहमी वाटते. म्हणूनच मी माझ्या मुलांना नेहमी सांगते की आधी आपलं शिक्षण पूर्ण करा आणि मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा. जेव्हा UNICEF ने मला भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करण्याबद्दल विचारलं, तेव्हा मला ते खूप मनापासून करावंसं वाटलं, कारण शिक्षण पूर्ण न केल्याची खंत माझ्या मनात होतीच.”
करीना आणि UNICEF
करीना कपूर २०१४ पासून UNICEF इंडियासोबत जोडलेली आहे. ती मुलींचं शिक्षण, लैंगिक समानता आणि मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी नेहमीच आवाज उठवत असते.
