पूर्व विदर्भात पावसाचा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत

| Published : Jul 24 2024, 06:52 PM IST

Vidarbha Heavy Rain Update

सार

Vidarbha Heavy Rain Update : गेल्या काही दिवसापासून उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे.

Vidarbha Heavy Rain Update : गेल्या काही दिवसापासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. तर पूर्व विदर्भात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे. परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक नदीनाल्याच्या काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबत अनेक गावांची मुख्य शहरांशी संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.

महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीने धारण केलं रौद्ररूप

गोंदिया जिल्ह्यात सलग सहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. सततच्या पावसामुळे वैनगंगेने रौद्ररूप धारण केले असुन तिरोडा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन वैनगंगेच्या पाण्याखाली आली आहे. मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवर तसेच महाराष्ट्रातील पुजारीटोला धरणांमधून पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे वैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस

मध्यप्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील पुजारी टोला, संजय सरोवर या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आणि त्याचे पाणी महाराष्ट्राच्या सीमेतील भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीत प्रवाहित होत आहे. परिणामी, तुमसर तालुक्यातील बपेरा येथील बावनथडी नदीवरून तीन फूट पाणी वाहत असल्याने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

सध्या गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अनेक गावांचा अजूनही संपर्क तुटला असून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेच्यावतीने मदत दिली जात आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आणखी वाचा : 

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार

रविकांत तुपकरांनी काढला नवा पक्ष, महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी विधानसभा लढणार

ट्रेनी IAS पूजा खेडकर मोबाईल स्विच ऑफ करून गायब? LBSNAA पोहोचली नाही