- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert : रायगड, रत्नागिरीत गणेशोत्सवावेळी अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत काय असणार स्थिती? घ्या जाणून
Maharashtra Rain Alert : रायगड, रत्नागिरीत गणेशोत्सवावेळी अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत काय असणार स्थिती? घ्या जाणून
मुंबई : येत्या दोन-तीन दिवसांवर गणेशोत्सवाचा सण येऊन ठेपला आहे. अशातच गणेशोत्सवावेळी कोकणासह रागयडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर मुंबईतील हवामान कसे असेल याबद्दलचे अपडेट्स खाली जाणून घ्या.

गणेशोत्सवावेळी पाऊस
महाराष्ट्रातील आणि कोकणातील नागरिकांसाठी गणेशोत्सव महत्त्वाचा असतो. यंदा जून-जुलै महिन्यात पावसाने हात आखडता घेतल्यानंतर ऑगस्टपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी पुढील दोन आठवड्यांचा अंदाज जाहीर केला असून, गणेशोत्सवादरम्यान कोकण विभागात पावसाची शक्यता असल्याचे समोर आले आहे.
कोकणातील पावसाचा अंदाज
२१ ऑगस्टपासून २८ ऑगस्टदरम्यान उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये सरासरी २० ते ४० मिलीमीटर पाऊस प्रतिदिन होऊ शकतो. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये या आठवड्यात पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील. मात्र २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण कोकणात पुन्हा २० ते ४० मिलीमीटर पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्रावर परिणाम
देशाच्या वायव्य भागात २२ ऑगस्टपासून सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम उत्तर कोकण तसेच उत्तर-मध्य महाराष्ट्रावर होऊ शकतो. दररोज सरासरीपेक्षा ७ ते १५ मिमी अधिक पाऊस पडू शकतो. विशेषत: २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान कोकण किनारपट्टीवर सरासरीपेक्षा किंचित जास्त पावसाची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड आणि रत्नागिरी येथे २४ ते २६ ऑगस्टदरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे.
- २६ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्य.
- धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये २४ व २५ ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज.
- पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात २६ ऑगस्टला मुसळधार पाऊस होऊ शकतो. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.
मान्सूनमध्ये बदल आणि 'MJO' चा परिणाम
निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी 'मॅडन ज्युलियन ऑस्सिलेशन' (MJO) या घटकाच्या प्रवेशामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल आणि तो वायव्य दिशेने सरकेल. त्यामुळे २६ ते २८ ऑगस्टदरम्यान नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, खान्देश, विदर्भासह मुंबई, ठाणे, पालघर येथे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
धरणसाठ्यात वाढीची शक्यता
'MJO' मुळे उष्णकटिबंधीय प्रदेशातील मान्सूनमध्ये बदल होऊ शकतात. याचा परिणाम सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील नद्या तसेच विदर्भ-खान्देशातील नद्यांवर दिसून येऊ शकतो. पावसामुळे धरणांमधील जलसाठ्याच्या टक्केवारीत वाढ होत राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

