Breakup Psychology : एखाद्याला विसरणं इतकं कठीण का असतं? सायकोलॉजी काय सांगते?
आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. काही काळ सोबत राहतात आणि नंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने दूर जातात. व्यक्ती दूर गेली तरी त्यांच्या आठवणी मात्र आपल्याला सोडत नाहीत. एखाद्याला विसरणं इतकं कठीण का असतं? यावर सायकोलॉजी काय सांगते ते पाहूया.

सायकोलॉजी फॅक्ट्स
मुंबई : आपल्या आयुष्यातील काही लोक सोबत नसले तरी ते आपल्या विचारांमध्ये कायम राहतात. एकेकाळी रोज बोलणारी व्यक्ती, एकत्र घालवलेला वेळ, छोट्या-छोट्या आठवणी... नातं संपल्यानंतरही या गोष्टी वारंवार आठवतात. आपण त्यांना विसरण्याचा प्रयत्न करतो, पण ते शक्य का होत नाही? हा प्रश्न अनेकांना सतावतो. एखाद्याला विसरणं इतकं कठीण का असतं, यामागचं सायकोलॉजिकल कारण आपण इथे समजून घेऊ.

मेंदूची करामत
आपला मेंदू महत्त्वाची नाती फक्त सामान्य आठवणी म्हणून साठवून ठेवत नाही. जवळच्या व्यक्तीसोबत सुरक्षितता, आनंद आणि आधार यांसारख्या भावना जोडलेल्या असतात. म्हणूनच ती व्यक्ती दूर गेल्यानंतरही तिचे विचार सहज आपल्या मनात येतात. विशेषतः प्रेमाच्या नात्यात हे जास्त दिसून येतं. ब्रेकअप म्हणजे फक्त एक व्यक्ती दूर जाणं नव्हे, तर आपल्या रोजच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या भावनिक व्यवस्थेत बदल होणं. संशोधनानुसार, नातं तुटल्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणी काही काळ राहणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
आठवणींची भूमिका
एखाद्या व्यक्तीसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आपल्याला आठवण राहीलच असं नाही. पण भावनिकदृष्ट्या जोडलेल्या घटना मात्र जास्त काळ लक्षात राहतात. पहिली ओळख, पहिला फोन कॉल, एकत्र फिरलेली जागा, एखादं गाणं... आपला मेंदू या गोष्टींना त्या व्यक्तीशी जोडतो. नंतर तेच गाणं ऐकलं किंवा तीच जागा पाहिली की जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.
वारंवार विचार करणे
"असं का झालं? मी तसं बोलायला नको होतं" अशा प्रश्नांची उत्तरे मन वारंवार शोधत राहतं. सायकोलॉजीमध्ये याला 'रुमिनेशन' (Rumination) म्हणतात. अभ्यासानुसार, असुरक्षिततेची भावना जास्त असलेल्या लोकांमध्ये ब्रेकअपनंतर असे विचार जास्त येतात.
बळजबरीने प्रयत्न करणे
एखाद्या व्यक्तीला विसरायचंच, असा बळजबरीने प्रयत्न करणं कधीच योग्य नसतं. एखादा विचार येऊ नये म्हणून आपण जेवढा प्रयत्न करतो, तेवढंच आपलं लक्ष त्या विचारावर जास्त केंद्रित होतं. त्रासदायक आठवणी पूर्णपणे दाबून टाकण्यापेक्षा, त्या आल्यावर त्यांचा स्वीकार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करणं केव्हाही चांगलं. घडलेला प्रकार समजून घेणं, आपल्या भावना लिहून काढणं, जवळच्या व्यक्तींशी बोलणं आणि नवीन गोष्टींना संधी देणं यामुळे जुन्या आठवणींमधून बाहेर पडायला नक्कीच मदत होते.
