
संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गडचिरोलीतील धानोरा येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन आदिवासी मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. सहा मुलींना सर्पदंश झाला असून त्यापैकी तीन मुलींचा मृत्यू झाला, तर उपचार सुरू असलेल्या मुलींची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.आश्रमशाळांमध्ये पुरेशा सुविधा, बेड आणि रुग्णवाहिका नसल्याचा आरोप करत राऊत यांनी आदिवासी भागातील आरोग्यव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. गडचिरोलीतील खाण उद्योगामुळे जंगल, नद्या आणि डोंगरांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खाण उद्योगातील वाहनांमुळे आदिवासींच्या मृत्यूंची नोंद होत नसल्याचा दावाही त्यांनी केला.गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याच्या विकासाच्या दाव्यांवरही राऊत यांनी टीका केली. आदिवासी आश्रमशाळांना दिल्या जाणाऱ्या निधीचा हिशोब आणि त्याच्या वापराबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.या विषयावर आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगत, आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला असून काही प्रकरणे ग्रीन ट्रिब्युनलकडे नेल्याचे राऊत म्हणाले. तसेच हा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्याची मागणी त्यांनी केली.याशिवाय महाराष्ट्रातील कंपन्या बंद होणे किंवा राज्याबाहेर जाणे, रोजगार आणि सरकारच्या औद्योगिक धोरणांवरही संजय राऊत यांनी टीका केली.