Maharashtra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल करत म्हणाले की, “सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हाही, आणि आता पुन्हा हंबरडा मोर्चा काढत आहेत'.

Maharashtra : ठाण्यात म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या लॉटरी प्रक्रियेनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. “पूर्वी जे घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हाही हंबरडा फोडला,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज

छत्रपती संभाजी महाराजनगरात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चावर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. “आम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहिल्या. म्हणूनच राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे, तसेच १० हजार रुपयांची तातडीची मदत खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.

“काही जण फोटो काढतात, आम्ही मदतसंच पाठवतो”

शिंदे म्हणाले, “काही जण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फक्त फोटो काढतात, पण त्यांच्या मुलाच्या हातात बिस्किट दिलं का? आम्ही मात्र मोठे मदतसंच पाठवले.”त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा दिला असून, शेतकऱ्यांना ठोस आधार मिळेपर्यंत सरकार थांबणार नाही.

“उद्धव ठाकरे सत्तेसाठी पाकिस्तानलाही सोबत घेतील”

मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या बैठकीत बोलताना शिंदे यांनी पुन्हा ठाकरेंवर निशाणा साधला. “उद्धव ठाकरे सत्तेसाठी ‘एमआयएम’च काय, पाकिस्तानलाही सोबत घेतील. निवडणूक जिंकण्यासाठी ते काहीही करतील,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “मुंबईत ठाकरेंनी घोटाळे केले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवरच आसूड ओढून घ्यायला हवा,” असे शिंदे म्हणाले.