अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकीकरणाबाबतचे अनेक गुप्त तपशील समोर आले आहेत. जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांची शेवटची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणण्याची होती आणि त्यासाठी अंतिम घोषणेची तारीखही ठरली होती.

Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या हयातीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात, यासाठी गंभीर प्रयत्न सुरू होते, अशी महत्त्वाची माहिती शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना जयंत पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांत झालेल्या बैठका, चर्चा आणि अंतिम निर्णयापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

राष्ट्रवादी एकत्र करण्याची अजित पवारांची मनोमन इच्छा

जयंत पाटील यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या हयातीतच राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यावी, ही अजित पवार यांची तीव्र इच्छा होती. मागील सहा महिन्यांत झालेल्या अनेक बैठकींमध्ये अजित पवारांनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती. शरद पवारांनी या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी आपल्यावर सोपवली होती, असेही जयंत पाटील म्हणाले.

आठ ते दहा बैठका; जयंत पाटील यांच्या घरीच चर्चा

राष्ट्रवादी एकीकरणासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात आठ ते दहा वेळा सविस्तर चर्चा झाल्या होत्या. बहुतांश बैठका जयंत पाटील यांच्या घरीच पार पडल्या. सुरुवातीच्या बैठकींमध्ये अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत, शरद पवारांबरोबरचे मतभेद विसरून पुन्हा एकत्र येण्याचा आग्रह धरला होता. “गेल्या दोन-अडीच वर्षांचा कालखंड मागे टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध व्हावी,” ही त्यांची अंतिम भूमिका होती, असे पाटील यांनी सांगितले.

१२ फेब्रुवारीला मोठ्या घोषणेची तयारी होती

जयंत पाटील यांनी खुलासा केला की, जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादी एकत्र येण्याची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय झाला होता. त्या आधी जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढवण्यावरही एकमत झाले होते. या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे यांचाही सहभाग होता. अंतिम तारीख जयंत पाटील ठरवतील, ती आम्हाला मान्य असेल, असे अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितले होते.

सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा अंतर्गत विषय

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, हा अजित पवार गटाचा अंतर्गत निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच असे निर्णय घेतले जात असतील. सध्या अजित पवार गटाचे निर्णय प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ घेत असल्याचे दिसते, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवार चांगले मुख्यमंत्री ठरले असते

जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या नेतृत्वक्षमतेचे कौतुक करत सांगितले की, अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी महाराष्ट्रात प्रभावीपणे काम केले असते. निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करायची, याचे उत्तम ज्ञान त्यांना होते. “अजित पवार महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री बनले असते,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.