लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहारवर चाकू हल्ला करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर जवळपास १५ तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र मयंकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याच्या आईचा टाहो काळीज पिळवटून टाकणारा आहे.

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहार या २२ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. विरार लोकल ट्रेनमध्ये दरवाजा लावण्यावरुन झालेल्या वादावेळी आरोपी रोशन सुपर्ण याने मयंकच्या पोटात चाकू भोसकला. यात मयंक गंभीर जखमी झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयंकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या आईचा, बहिणीचा टाहो काळीज पिळवटून टाकणारा आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विवारमध्ये राहणाऱ्या मयंकच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी भागातील चकाला वेस्टसाइडमध्ये मयंक सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करत होता. ज्यावेळी मयंकवर हल्ला झाला, त्यावेळी या हल्ल्याबाबत कोणतीही माहिती नव्हती. मात्र मंगळवारी रात्री १२ वाजता पोलिसांनी फोन करुन मयंकच्या मृत्यूची माहिती दिली. मयंक आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मूळचं उत्तराखंड येथील राहणारं आहे.

मंयकच्या मृत्यूनंतर त्याच्या आईची अवस्था बिकट झाली आहे. कामावर गेलेला माझा मुलगा आतापर्यंत घरी आलेला नाही, आपल्या लेकरासाठी आईचा टाहो काळीज पिळवटून टाकणार आहे. मयंकच्या आईने हात जोडून विनंती करत त्या हल्लेखोराला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

जर मयंकला कोणी मदत केली असती तर तो आज जिवंत असता, त्याला आरोपीने ज्यावेळी चाकूने भोसकलं त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मयंकला वाचवायला हवं होतं, पण त्याला कोणीही मदत केली नसल्याची खंत मयंकच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. सुरक्षेबाबत काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाही, चाकू घेऊन लोक ट्रेनमध्ये फिरत आहेत. त्याला कोणतीही सुरक्षा दिली गेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे लोक त्यावेळी काय करत होते असा सलाव मयंकच्या बहिणीने केला आहे. ही घटना कोणत्या सुमसान ठिकाणी घडलेली नाही. ट्रेनमध्ये अनेक लोक होते, ट्रेन रिकामी नव्हती, पण कोणीही मदत केली नाही, अशी भावना मयंकच्या बहिणीने व्यक्त केली आहे.