Sanjay Raut on Eknath Shinde : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करत त्यांच्या प्रकृतीसोबत महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो असा टोला लगावला आहे.
मुंबई : 'माणसाला कुठे थांबायचं हे कळत नाही, त्याचा अंत फार वाईट होतो. हा जगातला रामायण, महाभारत, बायबल, कुराण कोणत्याही धर्मात पाहा हे त्यातलं तत्व आहे. जोपर्यंत कुठे थांबायचं कळत नाही तोपर्यंत तुम्ही समाधानी नाही. समाधान हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. तुम्ही आमदार, खासदार, कार्यकर्ते फोडताय. ३० कोटी, ५०-५० कोटी दिले जात आहेत. कालच एका आमदाराला २० कोटींची ऑफर दिली गेली. किती पाहिजे तुम्हाला? मग स्ट्रेसमुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. हे करू नका, थांबा कुठेतरी, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, एक पूर्णविराम तयार करावा, अन्यथा अंत आपोआप होतो', असा टोला संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांना त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी याबाबत बोलताना सांगितलं, 'त्यांना अतिश्रमामुळे आजारी पडल्याचं सांगण्यात आलं आहे. टॉलस्टॉयच्या कथेतील एक म्हातारादेखील अतिश्रमामुळे पडला. तो टांगा चालवायचा. तेव्हा रिक्षा नव्हती. त्यामुळे तो जीविकेसाठी टांगा चालवायचा. ही माझ्या मनाची गोष्ट सांगत नाही, ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे ते आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीला आराम पडो, आणि त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो', असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
पुढे ते म्हणाले, 'तुमच्या हातात अफाट सत्ता आहे, यंत्रणा आहे आणि राम मंदिराचा लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे ह पैसा आलाय हा लुटलेला पैसा आहे. हा पापाचा पैसा पचणार नाही. ज्या कोणी ६ खासदार किंवा अन्य कोणी त्याआधी असतील, ज्यांनी हा पापाचा पैसा घेतला असेल, त्यांना आणि त्यांचा मुलाबाळांना तो अजिबात पचणार नाही. हा इतिहास आहे, टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्यासारखे हे सगळे २ फूट जमिनीत कोसळणार आहेत', असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या आमदार-खासदारांवर टीकास्त्र सोडलं आहे.


