ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या ठाम मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन छेडणार असून, यावेळी ते नेमकं काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज ते शिवनेरीवर दाखल झाले असून रात्री दोन वाजता पारनेरमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारो मराठा बांधवांसह ते आंदोलनावर ठाम असून "ओबीसीतून मराठा आरक्षण द्या" या मागणीसाठी ते मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत आंदोलनासाठी मर्यादित परवानगी
मुंबई पोलिसांनी 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलनासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नाही. आझाद मैदानात 7 हजार स्क्वेअर मीटर क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले असून क्षमतेनुसार केवळ 5000 आंदोलकांना परवानगी देण्यात आली आहे.
पुण्यात वाहतुकीत बदल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे पुणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीतील बदलाचे आदेश दिले आहेत.
- नगर-कल्याण मार्गावरील 14 नंबर जांबुत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगर मार्गे वळविण्यात आली आहे.
- नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे वळविण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या
1. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत याची अंमलबजावणी करावी.
2. हैदराबाद गॅझेटियर तातडीने लागू करावा.
3. "सगे सोयरे" अध्यादेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी.
4. आंदोलनकर्त्यांवर झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
5. कायद्यात बसणारे ठोस आरक्षण द्यावे.
आंदोलनाचा मार्ग
- 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीवरून निघून पैठण–शेवगाव–अहिल्यानगरमार्गे शिवनेरी (जुन्नर मुक्काम).
- 28 ऑगस्टला खेड–चाकण–लोणावळा–वाशी–चेंबूर मार्गे मुंबई गाठणार.
- 28 ऑगस्टच्या रात्री आझाद मैदानावर आगमन.
- 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन.


