Maharashtra Weather : मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेचा तडाखा वाढणार असून 36 अंशांपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. याचदरम्यान अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, मात्र महाराष्ट्रावर त्याचा मर्यादित परिणाम होईल.
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे नागरिकांची अक्षरशः कोंडी होत असून आता उष्णतेचा कडाका आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात 6 मेपासून उष्ण आणि दमट हवामानासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढतच राहण्याची शक्यता आहे.
मुंबई-कोकणात उष्णतेचा इशारा
हवामान विभागाने 6 ते 8 मे दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले जाण्याची शक्यता आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास होऊ शकतो.
वाऱ्यांच्या बदलत्या दिशेमुळे तापमान वाढ
सध्या पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि खालच्या स्तरावर उत्तर-ईशान्य दिशेने येणारे उष्ण वारे यामुळे तापमान वाढीस चालना मिळत आहे. याशिवाय महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे उष्ण हवा अडकून राहून उकाडा आणखी वाढू शकतो. ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता
या आठवड्याच्या अखेरीस अरबी समुद्रात चक्रीवादळ प्रणाली तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ही प्रणाली केरळ किनारपट्टीजवळ निर्माण होऊ शकते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. पुढील 48 ते 72 तासांत याबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येईल.
चिखलदऱ्यातही उष्णतेचा परिणाम; पर्यटनावर परिणाम
सातपुडा पर्वतरांगांतील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यातही यंदा उष्णतेचा मोठा परिणाम जाणवत आहे. तापमान 42 अंशांच्या पुढे गेल्याने पर्यटकांनी या ठिकाणाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी पर्यटनस्थळे ओस पडली असून स्थानिक व्यवसायांवर त्याचा फटका बसत आहे.
नागरिकांसाठी सूचना
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे आणि उष्णतेपासून बचावासाठी योग्य खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.


