लातूर जिल्ह्यात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक पेट्रोल पंपांवर मर्यादित पुरवठ्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, याचा सर्वाधिक फटका शेतीच्या कामांना बसत आहे. जिल्हा प्रशासनाने कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा मर्यादित झाल्याने वाहनधारकांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील दैनंदिन वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. सध्याच्या परिस्थितीत काही पेट्रोल पंपांनी डिझेल विक्रीवर निर्बंध घातले आहेत. ठराविक रकमेपेक्षा (सुमारे 3 हजार रुपयांपेक्षा जास्त) डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल घेणाऱ्या शेतकरी आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डिझेल खरेदीला अडचणीचा सामना 

या टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या शेती हंगामासाठी नांगरणी आणि इतर कामांसाठी डिझेलची मोठी गरज असताना पुरवठा कमी झाल्याने शेतीची कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लांबच लांब रांगा आणि अचानक वाढलेली मागणी यामुळे प्रशासनालाही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत.

जिल्हा प्रशासनाने काय म्हटलं?

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इंधन साठ्याचे प्रदर्शन, सीसीटीव्ही देखरेख आणि पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये. मात्र, परिस्थिती लवकर सुधारली नाही तर शेती आणि वाहतूक क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.