Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी वाढ झाली असून अनेक भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. त्याचवेळी काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. आता राज्यावर दुहेरी हवामान संकट घोंघावत असल्याचे चित्र दिसत आहे. 13 मार्च 2026 रोजी राज्यातील बहुतांश भागांत उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेसोबतच बदलत्या हवामानाचा सामना करावा लागू शकतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात कमाल तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रात 24 तासांत हवामान बदलणार

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत सध्या कोरडे हवामान आहे. मात्र पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागात कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथे कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आज पावसाची शक्यता नसली तरी नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मराठवाड्यातही उष्णतेसोबत अवकाळीची शक्यता

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत सध्या उष्ण आणि कोरडे हवामान आहे. मात्र पुढील 24 तासांत हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात उष्णतेसोबत पावसाचाही इशारा

विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मात्र या भागातही हवामानात अचानक बदल होऊन पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारपासून संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला

राज्यातील अनेक भागांत तापमान सरासरीपेक्षा 3 ते 6 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले जात आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.