हवामान विभागाने राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून, नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होणार असून अनेक भागांमध्ये उकाड्याचा तडाखा अधिक जाणवणार आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उष्णतेच्या प्रमाणात होणार वाढ
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता अधिक राहणार आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कोरडे हवामान आणि स्वच्छ आकाश यामुळे तापमान सातत्याने वाढत आहे. पावसाचा कोणताही अंदाज नसल्याने उष्णतेचा परिणाम आणखी तीव्र होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बाहेर पडण्याचा न दिला सल्ला
काही शहरांमध्ये आधीच तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असून पुढील दोन ते तीन दिवसांत त्यात आणखी 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. कोकण भागात तापमान तुलनेने कमी असले तरी आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत आहे. त्यामुळे “फील्स लाईक” तापमान जास्त भासते आणि नागरिकांना अस्वस्थता जाणवते.
दरम्यान, नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी अधिक सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


