Maharashtra Elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांत ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यांत होऊ शकतात, प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक टप्प्यावर नवा रंग, नवा खेळ पाहायला मिळतो. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात या निवडणुका चार टप्प्यांत होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

राज्यात अनेक महापालिका आणि जिल्हा परिषदा गेल्या दोन ते पाच वर्षांपासून प्रशासनाच्या हाती चालवल्या जात आहेत. कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांमुळे या निवडणुका वारंवार लांबणीवर पडत होत्या. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता निवडणूक आयोगाने हालचाल सुरू केली आहे.

चार टप्प्यांत निवडणुका, वेगळे वेळापत्रक महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी?

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोग चार टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचा विचार करत आहे. शिवाय, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यांत घेण्याची शक्यता आहे. सध्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

राजकीय हालचालींना वेग

या पार्श्वभूमीवर, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख गटांमध्ये रणनीती आखली जात आहे. प्रत्येक पक्ष आपली मतपेटी मजबूत करण्यासाठी मैदानात उतरला आहे. युती करून लढायचं की स्वतंत्रपणे, यावरही पक्षांतर्गत चर्चा रंगात आली आहे.

जनतेचा मूड काय सांगतो?

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेचा नेमका कल कुठे झुकतो हे स्पष्ट होणार आहे.

या निवडणुकांमधून महाराष्ट्राचं आगामी राजकीय चित्र स्पष्ट होईल, आणि हेच पक्षांसाठी पुढील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दिशादर्शक ठरेल.