भारतातील शहरांमध्ये आरामात जगण्यासाठी महिन्याला दीड ते दोन लाख रुपये पगार पुरेसा आहे, असं एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. यानंतर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. जास्त पगार म्हणजे जास्त ताण आणि ढासळलेली जीवनशैली, त्यामुळे बचतीवर आणि वर्क-लाइफ बॅलन्सवर लक्ष केंद्रित करावं, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुंबई : भारतातील शहरांमध्ये आरामात जगण्यासाठी महिन्याला किती पगार लागतो? जास्त पगाराच्या मागे धावताना आपण आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी गमावत आहोत का? हे प्रश्न उपस्थित करणारी एक सोशल मीडिया पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, शहरात राहणाऱ्या एका प्रोफेशनल व्यक्तीसाठी महिन्याला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न आरामात जगण्यासाठी पुरेसं आहे.

'जास्त पगार, जास्त ताण'

मोहित तलरजा नावाच्या एका व्यक्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा विचार मांडला आहे. त्याच्या मते, उत्पन्न वाढवण्यासाठी सतत धावल्याने आयुष्याची गुणवत्ता सुधारेलच असं नाही. उलट, जास्त पगाराच्या नोकरीमुळे कामाचा ताण वाढतो, आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि कुटुंब व वैयक्तिक आयुष्यासाठी कमी वेळ मिळतो, अशा अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः, जास्त पगारासोबत खर्च आणि जीवनशैलीही त्याच वेगाने वाढत असेल, तर आर्थिक स्वातंत्र्य मिळेलच याची खात्री नसते, असंही तो म्हणतो. मोठं घर, महागडी गाडी, जास्त प्रवास आणि वाढलेला राहणीमानाचा खर्च यांसारख्या गोष्टी उत्पन्न वाढीसोबत वाढल्या, तर बचतीत फारसा फरक पडत नाही.

View post on Instagram
 

'कसा खर्च करता आणि किती वाचवता'

त्यामुळे 'जास्त कमावण्या'पेक्षा 'किती कमावता, किती आणि कसा खर्च करता, आणि किती वाचवता' हे जास्त महत्त्वाचं आहे, असं मत अनेक सोशल मीडिया युजर्सनी व्हिडिओखालील कमेंट्समध्ये मांडलं आहे. मात्र, दीड ते दोन लाखांची रक्कम सगळ्यांसाठीच पुरेशी असेल असं नाही. भारतातच मुंबई, बंगळूरू, दिल्ली यांसारख्या महागड्या शहरांमधील घरभाडं, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे 'पुरेसा पगार' ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीनुसार बदलते, असंही काही जणांनी म्हटलं आहे. तरीही, पगाराच्या आकड्यापेक्षा आयुष्यातील संतुलनाला महत्त्व देण्याचा संदेश अनेकांना आवडला आहे.