अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीच्या कायदेशीर टीमने महत्त्वाचे निवेदन जारी केले आहे.
मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचे पती हिमांशु मल्होत्रा यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, आता अमृताच्या कायदेशीर टीमने या चर्चांवर तीव्र नाराजी व्यक्त करत महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
घटस्फोटाच्या चर्चांवर अमृताची लीगल टीम आक्रमक
10 ऑगस्ट 2026 रोजी अमृता खानविलकरच्या कायदेशीर टीमने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. ऑनलाइन, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमृताबाबत खोटी, बदनामी करणारे आणि तिच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणारी माहिती पोस्ट केली जात असल्याचे टीमने म्हटले आहे. अमृताच्या वकिलांनी स्पष्ट केले की, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र या स्वातंत्र्याचा गैरवापर करून अफवा, बिनवुडाचे दावे किंवा चुकीची माहिती पसरवणे स्वीकारले जाणार नाही.
चुकीची माहिती पसरवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
अमृताच्या कायदेशीर टीमने अशा प्रकारची माहिती तयार करणाऱ्या, प्रकाशित करणाऱ्या किंवा सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच अशा सर्व प्रकरणांवर लक्ष ठेवले जात असून संबंधित माहिती आणि पुरावे नोंदवून ठेवले जात असल्याचेही टीमने सांगितले आहे. त्यामुळे अमृताच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी त्याचे व्हेरिफिकेशन करण्याचे आवाहन केले आहे.
18 महिन्यांपासून वेगळे राहत असल्याचा दावा
अमृता आणि हिमांशु गेल्या 18 महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचा दावा करणारा एक रिपोर्ट यापूर्वी समोर आला होता. मात्र, या रिपोर्टमध्ये त्यांच्या घटस्फोटाची किंवा कायदेशीर विभक्त होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निश्चितपणे सांगण्यात आलेले नाही.
एका जवळच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये सध्या घटस्फोट किंवा कायदेशीर विभक्त होण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. वेगवेगळ्या घरात राहत असले तरी त्यांचे संबंध चांगले असून ते आजही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगण्यात आले आहे.
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबतही संवाद
रिपोर्टनुसार, वेगळे राहण्यामागे कोणताही मोठा वाद किंवा भांडण नसून काही व्यावहारिक कारणे असल्याचे सांगितले जाते. दोघेही आपल्या भविष्याचा विचार करण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्याबाबत काही गोष्टी समजून घेण्यासाठी एकमेकांना स्पेस देत असल्याचेही म्हटले आहे.
2004 मध्ये झाली होती पहिली भेट
अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा यांची पहिली भेट 2004 मध्ये 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या शोच्या सेटवर झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे त्यांच्या नात्याचे प्रेमात रूपांतर झाले. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी जानेवारी 2015 मध्ये लग्न केले. लग्नानंतर त्याच वर्षी अमृता आणि हिमांशु यांनी 'नच बलिए 7' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आणि या शोचे विजेतेपदही पटकावले.


