- Home
- Utility News
- रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; आता सामान्य प्रवाशांचा प्रवास होणार 'हायटेक' आणि स्वच्छ
रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; आता सामान्य प्रवाशांचा प्रवास होणार 'हायटेक' आणि स्वच्छ
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'मिशन ५२' अंतर्गत रेल्वेमध्ये मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे. याची सुरुवात सर्वाधिक गर्दी असणाऱ्या जनरल डब्यांच्या स्वच्छतेपासून होणार असून, यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा
Indian Railway Update: भारतीय रेल्वेने आता खऱ्या अर्थाने 'आम आदमी'च्या प्रवासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता केवळ एसी किंवा स्लीपरच नव्हे, तर जनरल डबेही चकाचक दिसणार आहेत.
आठवड्याला ५२ सुधारणांचे लक्ष्य!
रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी 'मिशन ५२' जाहीर केले आहे. म्हणजेच, रेल्वेमध्ये दर आठवड्याला एक याप्रमाणे वर्षभरात ५२ मोठ्या सुधारणा केल्या जाणार आहेत. याची सुरुवात सर्वाधिक गर्दी असणाऱ्या जनरल डब्यांच्या स्वच्छतेपासून होणार आहे.
आता जनरल डबेही असणार चकाचक!
आतापर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एसी आणि स्लीपर कोचच्या स्वच्छतेवर भर दिला जात असे. मात्र, जनरल डब्यांची अवस्था अनेकदा दयनीय असायची. आता हे चित्र बदलणार आहे.
नियमित स्वच्छता: जनरल डब्यातील शौचालये, वॉशबेसिन आणि कचरापेट्यांची दररोज कसून साफसफाई केली जाईल.
नवे नियोजन: जनरल डबे आतून जोडलेले नसले तरी, गाडी स्टेशनवर थांबताच स्वच्छता कर्मचारी तातडीने डब्यात शिरून स्वच्छतेचे काम पूर्ण करतील.
एआय (AI) ठेवणार स्वच्छतेवर नजर
रेल्वे आता स्वच्छतेसाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा वापर करणार आहे.
कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केल्यावर डब्याचे फोटो कंट्रोल रूमला पाठवणे अनिवार्य असेल.
AI तंत्रज्ञान त्या फोटोंची पडताळणी करेल की खरोखर स्वच्छता झाली आहे की नाही.
कामात कुचराई झाल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.
सुपरवायझरसाठी १२ वी उत्तीर्ण आणि ITI ही शैक्षणिक पात्रता अनिवार्य करून कामाचा दर्जा सुधारला जाणार आहे.
कार्गो नेटवर्कमधून ३० हजार कोटींची कमाई
केवळ प्रवासी सेवाच नाही, तर रेल्वेच्या उत्पन्नासाठी 'गतीशक्ती कार्गो टर्मिनल'चा मोठा विस्तार केला जाणार आहे. पुढील पाच वर्षांत ५०० नवीन टर्मिनल्स उभारण्याचे नियोजन असून, त्यातून रेल्वेला तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

