- Home
- Maharashtra
- गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार
गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार
रेल्वे मंत्रालयाने मनमाड ते कसारा दरम्यान तिसऱ्या, चौथ्या रेल्वे लाईनसाठी १०,१५४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार असून, कसारा घाटातील बँकरची समस्या दूर होईल.

गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट
मुंबई: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मनमाड ते कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्यासाठी तब्बल १०,१५४ कोटी रुपयांच्या महाकाय निधीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवासातील वेळ तर वाचणारच आहे, पण प्रवासाचा दर्जाही सुधारणार आहे.
प्रवासाचा कायापालट, काय आहे रेल्वेचा प्लॅन?
१३५ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या नवीन मार्गामुळे रेल्वे वाहतुकीतील सर्वात मोठा अडथळा दूर होणार आहे.
बँकरची कटकट मिटणार: कसारा घाटातील तीव्र चढ-उतारामुळे सध्या गाड्यांना अतिरिक्त इंजिन (बँकर) लावावे लागते. नवीन लाईनमुळे ही गरज भासणार नाही, परिणामी इगतपुरी आणि कसारा येथे इंजिन जोडण्यासाठी वाया जाणारा वेळ वाचणार आहे.
वेळेची मोठी बचत: या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा किमान २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
लोकल रेल्वेचे स्वप्न होणार साकार: नाशिक-मुंबई दरम्यान दररोज अप-डाऊन करणाऱ्यांसाठी 'नाशिक-मुंबई लोकल' सुरू होण्याची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि व्याप्ती
हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून आधुनिक इंजिनिअरिंगचा नमुना असणार आहे. यात खालील गोष्टींचा समावेश असेल
एकूण लांबी: १३१ किमी नवीन रेल्वेमार्ग.
बोगदे: एकूण २८ किमी लांबीचे ५ अत्याधुनिक बोगदे.
पूल: १६ महत्त्वाचे पूल, २१८ लहान पूल आणि ५ अवघड पूल.
कनेक्टिव्हिटी: २१ अंडरपास आणि ५ ओव्हरब्रिजमुळे रस्ते वाहतुकीलाही अडथळा येणार नाही.
कोणाकोणाला होणार फायदा?
१. मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांचा वेग वाढेल.
२. उत्तर भारत: भुसावळमार्गे उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
३. मालवाहतूक: इंधनाची आणि वेळेची बचत झाल्यामुळे मालवाहतुकीची क्षमता चारपटीने वाढण्याची अपेक्षा आहे.
४. मनमाड जंक्शन: दौंड-मनमाड आणि संभाजीनगर-मनमाड दुहेरीकरणामुळे मनमाड रेल्वे स्थानक आता महाराष्ट्रातील एक प्रमुख 'कनेक्टिव्हिटी हब' म्हणून उदयास येणार आहे.

