भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने टीम इंडियात परतण्याच्या आशा सोडल्या आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये तो भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. यानंतर त्याला संघात संधी मिळाली नाही, पण आयपीएलमध्ये आरसीबीकडून त्याने चांगली कामगिरी केली होती.

लखनऊ: गेल्या दोन आयपीएल सिझनमध्ये चांगली कामगिरी करूनही, टीम इंडियामध्ये परतण्याची आता कोणतीही आशा नसल्याचं भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने स्पष्ट केलं आहे. आपल्या कारकिर्दीतील सर्वात निराशाजनक क्षण हा २०१९ च्या वनडे वर्ल्ड कपमधील सेमी-फायनलमधील पराभव होता, असंही त्याने जतिन सप्रूच्या यूट्यूब चॅट शोमध्ये बोलताना सांगितलं.

भुवनेश्वर कुमार २०१९ वनडे वर्ल्ड कप आणि २०२२ टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी-फायनलमध्ये भारतीय संघाचा भाग होता. यापैकी न्यूझीलंडविरुद्धचा २०१९ मधील पराभव जास्त वेदनादायी होता, असं तो म्हणाला. "२०१९ मध्ये न्यूझीलंडने आमच्यासमोर २४० धावांचं सामान्य लक्ष्य ठेवलं होतं. भारत जिंकेल असंच सगळ्यांना वाटत होतं. पण पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी (रिझर्व्ह डे) गेला आणि खेळपट्टी ओली झाल्याने कदाचित गोष्टी बदलल्या. तो पराभव सर्वात जास्त निराशाजनक होता. पण २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धचा टी-२० सेमी-फायनलमधील पराभव वेगळा होता. टी-२० मध्ये खेळ कधीही बदलू शकतो," असं भुवीने स्पष्ट केलं.

भुवनेश्वर नोव्हेंबर २०२२ मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघात संधी मिळाली नाही, पण आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. तो म्हणाला, "जेव्हा मला संघातून वगळण्यात आलं, तेव्हा पुढच्या काही सीरिजमध्ये संधी मिळेल असं वाटलं होतं. टीम मॅनेजमेंटकडून तसे संकेतही मिळाले होते. पण नंतर गोष्टी बदलल्या हे माझ्या लक्षात आलं. याचं वाईट वाटलं, पण मी ते स्वीकारलं. या काळात कुटुंबाने मला खूप आधार दिला. आता मी पुनरागमनासाठी नाही, तर खेळाचा आनंद घेण्यासाठी खेळतो. पुन्हा भारतासाठी खेळायला मिळालं तर आनंदच आहे, पण मी आता त्याची वाट पाहत नाही."

२०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून हरल्यानंतर हा आपला शेवटचा वर्ल्ड कप असेल, असं आपण पत्नीला सांगितलं होतं, असंही भुवीने उघड केलं. तो म्हणाला, “एखाद्या मोठ्या स्पर्धेत पराभव झाल्यावर निवडकर्ते तरुण खेळाडूंना संधी देतात, हे स्वाभाविक आहे.”