उद्धव ठाकरे यांची आज मातोश्रीवर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राम मंदिरातील चोरी प्रकरणावर जोरदार टीकास्र सोडले.
मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खासदार फुटीच्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे चांगलेच संतप्त झाले आहेत. याशिवाय राम मंदिरातील दान चोरीच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे सातत्याने बोलत आहेत. याच कारणास्तव आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राम मंदिरातील चोरीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपासह राम मंदिरातील चोरी प्रकरणावर भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, "राम जन्मभूमी आंदोलनाचे भांडवल करुन भाजपाने अमाप सत्ता मिळवली. मात्र त्याच राम मंदिरात आज चोरी झाली. मंदिरात दान केला जाणारा पैसा पक्ष फोडाफोडी करण्यासाठी वापरला जातोय असे बोलले जातेय. तसेच उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख केला.अटलजींनी आता 'हिंदू मार खाणार नाहीत' असे म्हटले. यामुळेच राम मंदिरातील दान चोरी प्रकरणातील चोरांना हिंदूंकडूम माफी नाही असेही उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटले.
शिवसेनेचा राम मंदिराच्या आंदोलनातील सहभाग
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेने राम मंदिराच्या आंदोलनासाठी घेतलेल्या सहभागावरही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पूर्ण देश आज भाजपाच्या अधिपत्याखाली आहे. राम मंदिर आणि त्याच्या आंदोलनासाठी शिवसेनेसह त्यांच्या शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता. पण भाजपाने या गोष्टीचा वापर सत्तेसाठी केला. राम मंदिराचा मुद्दा चुकीच्या आणि वेगळ्या कारणास्तव चर्चेत आहे. याशिवाय राम मंदिरातील व्यवहार स्पष्ट नाहीत. यावरही उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थितीत केले. हे आता ऑपरेशन राम मंदिर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन
भाजपा आणि राम मंदिरातील चोरी प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलेच. पण रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे. येत्या रविवारी (5 जुलै) दादरमधील हनुमान मंदिरासमोर सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याचे आवाहन उद्धव ठाकेरेंनी केले आहे. यावेळी स्वत: उद्धव ठाकरे उपस्थितीत राहून रामरक्षा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.


