- Home
- Mumbai
- पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! फक्त ४० मिनिटांत गाठता येणार कर्जत; पाहा कधी सुरू होणार नवी लोकल?
पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! फक्त ४० मिनिटांत गाठता येणार कर्जत; पाहा कधी सुरू होणार नवी लोकल?
Panvel-Karjat Railway Corridor Project: पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडोरचे काम ८५% पूर्ण झाले असून, हा मार्ग २०२६ च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन मार्गामुळे पनवेल ते कर्जत हे अंतर फक्त ४० मिनिटांत कापता येणार आहे.

पनवेल-कर्जत प्रवास आता सुसाट! फक्त ४० मिनिटांत गाठता येणार कर्जत
नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडोरचे (Panvel-Karjat Railway Corridor) काम आता 'फिनिशिंग लाईन'वर आले आहे. हा मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांचा प्रवासाचा वेळ निम्म्याहून कमी होणार असून, नवी मुंबई आणि रायगडमधील कनेक्टिव्हिटीला नवा वेग मिळणार आहे.
प्रकल्प आता अंतिम टप्प्यात!
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे सुमारे ८५% काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. रेल्वेने २०२६ च्या सुरुवातीपर्यंत (किंवा या वर्षाच्या अखेरीस) हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २९.६ किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील डबल लाईन ट्रॅकचे ७०% काम पूर्ण झाले असून स्थानकांच्या उभारणीलाही वेग आला आहे.
प्रवाशांचा वेळ कसा वाचणार?
सध्या पनवेलहून कर्जतला रस्तेमार्गे जाण्यासाठी किमान दीड तास लागतो. मात्र, ही नवीन रेल्वे लाईन सुरू झाल्यानंतर
प्रवासाचा वेळ: अवघ्या ४० मिनिटांत पनवेल ते कर्जत अंतर कापता येईल.
थेट कनेक्टिव्हिटी: पनवेल स्थानकावर एस्केलेटरद्वारे थेट कर्जत लाईन पकडता येईल.
गर्दीतून सुटका: कल्याणमार्गे जाणाऱ्या सीएसएमटी-कर्जत लोकलवरील ताण कमी होईल.
काय आहेत या मार्गाची वैशिष्ट्ये?
हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अतिशय आधुनिक पद्धतीने उभारला जात आहे.
तीन मोठे बोगदे: या मार्गावर एकूण ३.१२ किमी लांबीचे तीन बोगदे आहेत, ज्यासाठी ३०० कोटी खर्च झाले आहेत.
पाच नवीन स्थानके: सुरुवातीला हा मार्ग पनवेल, चिखले, मोहोपे (पोएंजे), चौक आणि कर्जत या स्थानकांना जोडेल.
फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस: प्रवाशांच्या सोयीसाठी २ रेल्वे फ्लायओव्हर, ५ रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि १५ रोड अंडर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे.
एकूण खर्च: संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे २,७८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी ही 'लाईफलाईन' ठरणार आहे.

