Sant Tukaram Maharaj Beej Sohala 2026: संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त ५ मार्च रोजी देहूमध्ये मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने ४ ते ६ मार्च दरम्यान पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीत मोठे बदल केले.
पुणे : लाखो वारकरी आणि विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा यंदा ५ मार्च रोजी देहू नगरीत साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी होणारी भाविकांची अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. ४ ते ६ मार्च दरम्यान पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक प्रमुख मार्ग बंद राहणार असून, वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेली महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
हे मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असतील
उत्सवाच्या काळात भाविकांची पायपीट सुखकर व्हावी यासाठी खालील रस्ते सर्वसामान्यांसाठी बंद राहतील.
जुना मुंबई-पुणे महामार्ग: देहूगाव कमान ते देहू मुख्य गाव.
चाकण-तळेगाव रस्ता: देहू फाटा ते देहूगावाकडे जाणारा मार्ग.
औद्योगिक क्षेत्र: महिंद्रा सर्कल ते फिजुत्सु कॉर्नर, कॅनबे चौक आणि आयटी पार्क चौक.
निगडी परिसर: त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक आणि डायमंड चौक ते देहू मार्ग.
गावठाण परिसर: १४ टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक आणि काळोखे पाटील चौक ते परंडवाल चौक.
महत्त्वाची टीप: जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक ते झेंडे मळा) आता 'वन-वे' करण्यात आला आहे. झेंडेमळ्याकडून कंद पाटील चौकाकडे येण्यास मनाई असेल.
पर्यायी मार्ग कोणते?
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी भक्ती-शक्ती चौक, मोईफाटा, एच.पी. चौक, संविधान चौक, कृष्णानगर चौक आणि कुदळवाडी सर्कल या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.
भाविकांच्या गाड्या लावणार कुठे? (पार्किंग व्यवस्था)
प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पार्किंग झोन निश्चित केले आहेत.
येण्याचा मार्ग पार्किंगची जागा
आळंदी - तळवडे मार्गे माउली वजनकाटा, काळोखे पाटील चौक व लगतचे गायरान क्षेत्र.
देहू कमान मार्गे राधाकृष्ण लॉन्स शेजारील 'सीओडी' (COD) ची जागा.
देहू फाटा मार्गे सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि भगीरथी लॉन्स.
भक्तांना आवाहन
गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही.


