Mumbai Pydhonie Death Case : मुंबईतील पायधूनी भागात डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Mumbai Pydhonie Death Case : मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली असून या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. डोकाडिया कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यानंतर झाल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले होते. मात्र, आता वैद्यकीय तपासणीत काही वेगळेच संकेत मिळत असून हा प्रकार सामान्य अन्न विषबाधेचा नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अन्न विषबाधेपेक्षा वेगळे लक्षण; डॉक्टरांचे निरीक्षण

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले की, चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर स्वरूपात बिघडली होती, जी सामान्य अन्न विषबाधेत आढळत नाही. सुरुवातीला उलट्या आणि पोटदुखीची लक्षणे दिसल्यानंतर रुग्णांची न्यूरोलॉजिकल स्थिती झपाट्याने खालावत गेली आणि काही तासांतच सर्वांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात विषारी किंवा रासायनिक घटकांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे.

‘पेनकिलर-सदृश’ पदार्थाचा संशय

पोस्टमॉर्टेमदरम्यान मृतांच्या शरीरात ‘वेदनाशामकासारखा’ एक संशयित पदार्थ आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत रुग्णालय प्रशासनाने अधिकृत पुष्टी केलेली नाही. फॉरेन्सिक अहवालानंतरच या बाबत स्पष्टता येणार आहे.

FDAचा स्वतंत्र तपास; 11 नमुने जप्त

या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी घरातून विविध अन्नपदार्थांचे 11 नमुने जप्त केले असून त्यामध्ये कलिंगड, बिर्याणी, पाणी, चिकन, भात, खजूर आणि मसाल्यांचा समावेश आहे. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांची चौकशी; मोबाईल आणि आर्थिक व्यवहार तपासात

पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन जप्त करून त्यांच्या संपर्कांची चौकशी सुरू केली आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक आणि बँक व्यवहारांचाही तपास सुरू आहे. या घटनेमागे कोणतेही अन्य कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

घटनेची पार्श्वभूमी काय?

25 एप्रिल रोजी रात्री कुटुंबाने कलिंगड खाल्ल्यानंतर सर्वांना उलट्या, चक्कर आणि पोटदुखीची लक्षणे जाणवू लागली. पुढील दिवशी प्रकृती अधिक खालावत गेली आणि दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. सर्वांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.

तपास अहवालाकडे सर्वांचे लक्ष

या संपूर्ण घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, नेमका मृत्यूचा कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक अहवाल निर्णायक ठरणार आहे. पोलिस, डॉक्टर आणि संबंधित यंत्रणा तपासात गुंतली असून लवकरच सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.