पुण्यातील दौंडजवळच्या यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्यावरून दोन गटांमध्ये भांडण झाले. फेसबुकवरील पोस्टमुळे वाढलेल्या तणावातून दुकाने, घरे आणि धर्मस्थळांवर हल्ले झाले. 

पुणे: पुण्यातील दौंडजवळच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये भांडण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्यावरून हे भांडण वाढलं होतं. याचवेळी येथे भाजपचे गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्‌गुरु स्वामी हेमांगी सखीजी या तिघांनी या ठिकाणी येऊन भाषणे केली. त्यांची पाठ फिरताच यवत मध्ये आज सकाळी दंगल उसळली.

फेसबुकवर पोस्ट टाकल्याच्या कारणावरून झाला वाद 

फेसबुकवर पोस्ट टाकल्याच्या कारणावरून पुन्हा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आज थेट सकाळी बाजारपेठ बंद करून काही घरे, बेकरी व धर्मस्थळावर जमावाने हल्ला केला. यात काही दुकाने व घरांना आगी लावण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफ्यासह बंदोबस्तात हजेरी लावली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

संयम बाळगण्याचं केलं अवाहन 

स्थानिकांनी संयम बाळगावा आणि शांतता ठेवावी, असं आवाहन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केलं. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचं प्रयत्न सुरु आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं परिस्थिती बिघडली असा दावा दाखल करण्यात आला. सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन प्रशासनाच्या मदतीनं शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना यशदेखील येत असल्याचं आमदार कुल म्हणाले.

अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या 

घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी पोहचले. त्या ठिकाणी त्यांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. येथे संयम बाळगण्याचं अवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.