राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीत शाईफेक करण्यात आली. वारकरी संतांवरील टीकेच्या निषेधार्थ ही घटना घडल्याचे सांगितले जात असून, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेला वारकरी संप्रदायातील वाद यामुळे आणखी चिघळला आहे.

वारकरी संप्रदायात कथित घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि धार्मिक वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीत शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे वारकरी संप्रदायातील वाद आणखी तीव्र झाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

संग्राम भंडारे यांनी केला निषेध 

हभप संग्राम भंडारे यांनी आपल्या समर्थकांसह विकास लवांडे यांना काळे फासल्याचा आरोप समोर आला आहे. वारकरी संत आणि गुरुवर्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झाल्याचे सांगत त्यांनी हा निषेध केल्याचे म्हटले आहे. “गुरुवर्यांवर टीका सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर वादाला सुरुवात

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे लोक घुसल्याचा आरोप केला होता. यानंतर राज्यभरात चर्चा सुरू झाली होती. काही कीर्तनकार आणि महंतांची नावेही चर्चेत आली होती. त्याच पार्श्वभूमीवर विकास लवांडे यांनी काही संत आणि कीर्तनकारांवर गंभीर आरोप केले होते.

“तू लक्षात ठेव...” म्हणत संताप व्यक्त

शाईफेकीदरम्यान संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. “आमच्यावर काहीही बोला, पण गुरुवर्यांवर बोलू नका,” असे म्हणत त्यांनी लवांडे यांच्यावर संताप व्यक्त केला. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लवांडे यांचा गंभीर आरोप

या घटनेनंतर विकास लवंडे यांनी आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. धार्मिक भावना भडकवून काही लोक मुद्दाम वातावरण खराब करत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकारानंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेनंतर राज्यातील राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वारकरी संप्रदायाच्या नावावर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.