Nandurbar Shahada Hostel Food Poisoning : नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील एका हॉस्टेलमधील ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी ८ जणांचा प्रकृती गंभीर आहे.
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका हॉस्टेलमध्ये ४० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्यांचा तसंच इतर त्रास होऊ लागला. या घटनेनंतर तात्काळ १४ विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

हॉस्टेलमध्ये जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा
समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात जेवणातून ४० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यानंतर १४ जणांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी ८ जणांची तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्या ८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जेवणानंतर त्रास झालेल्या विद्यार्थ्यांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
केवळ विद्यार्थ्यांना त्रास, हॉस्टेल स्टाफवर हलगर्जीपणाचे आरोप
या घटनेनंतर झालेल्या चौकशीत गंभीर बाबी समोर आल्या आहेत. हॉस्टेलमध्ये कोणीही हॉस्टेल सुपरिटेंडेंट अर्थात वसतिगृह अधिकारी नव्हता. महत्त्वाची बाब म्हणजे जेवणातून विषबाधा केवळ विद्यार्थ्यांना झाली. हॉस्टेलच्या कोणत्याही अधिकारी किंवा इतर कोणत्याही स्टाफला विषबाधा किंवा इतर कोणताही त्रास झाला नाही. या जेवणानंतर केवळ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने स्टाफकडून हलगर्जीपणा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुलांची सुरक्षा धोक्यात, दोषींवर कारवाईवर आदेश
विषबाधा झाल्याच्या प्रकारानंतर याप्रकरणी जिल्हााधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सोशल वेलफेअर विभागाच्या या हॉस्टेलमध्ये खाण्याबाबत, जेवणाबाबत याआधीही अनेकदा तक्रारी आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. हॉस्टेलमधील खाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. मुलांच्या सुरक्षेशी, त्यांच्या आयुष्याची छेडछाड होत असल्याचा आरोप केला जात आहे. आता याप्रकरणी आता कठोर कारवाईची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. तसंच आता हॉस्टेलची स्वच्छता सुधारली जाईल असं सांगण्यात आलं आहे.

