उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदार म्हणून निवडून आल्याने आणि दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व ठेवणे शक्य नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. बारामती पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीत जाऊन त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा पत्र सादर केले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व ठेवणे शक्य नसल्याने त्यांनी हा औपचारिक निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
विक्रमी मतांनी मिळवल विजय
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. या विजयामुळे त्यांचे राज्यातील राजकीय वजन अधिक वाढले असून, हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे. नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीने संसद आणि विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी निवडून आल्यास एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक असते. त्यामुळे निकाल लागल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
जागा झाली रिक्त
दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली असून त्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. बारामतीतील मोठा विजय आणि त्यानंतरचा राजीनामा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पुढील रणनीती आणि नेतृत्वाबाबत चर्चा अधिक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.


