Mumbai : राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांनी शिंदेंवर कडवी टीका करत भूमिका स्पष्ट केली, तर राज ठाकरे यांच्याबाबत मौन बाळगले. 

Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक घेतलेली भेट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंवर कडक शब्दांत निशाणा साधला.

शिंदेंवर हल्लाबोल, राज ठाकरेंबाबत मौन

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली. “शिंदे प्रवृत्तीशी आमचं टोकाचं भांडण आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला,” असा आरोप त्यांनी केला. मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, “कोण कुणाला भेटतं यावर आमचं बंधन नाही,” असे म्हणत त्यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं.

 ‘आमची भूमिका ठाम, लढा सुरूच’

राऊत यांनी स्पष्ट केलं की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली भूमिका कायम ठेवणार आहे. “आमचा लढा सुरू आहे आणि या भांडणात आमचा जय होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटावर त्यांनी “शिवसेना चोरीतून नंदनवन तयार झालं” असा आरोप केला.

शरद पवार राज्यसभेवर जाणार?

राज्यात राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा रंगल्या असताना राऊत यांनी शरद पवार यांच्याबाबतही भूमिका स्पष्ट केली. “शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, हे मी खात्रीने सांगतो,” असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील निर्णय एकत्रित बैठकीत घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असणं महत्त्वाचं असल्याचेही त्यांनी नमूद केले.