पुण्यातील टीसीएस ऑफिसच्या बाहेरील फूटपाथवर झोपलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर कंपनीने आता स्पष्टीकरण दिले आहे. कर्मचारी कथित रुपात त्याला पगार न मिळाल्याने फूटपाथवरच झोपला होता.

मुंबई : ऑगस्ट २०२५ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्रातील पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या कार्यालयाबाहेर एक कर्मचारी फूटपाथवर झोपलेला दिसला. त्या फोटोसोबत एक पत्रही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये कर्मचाऱ्याने त्याच्या पगारावर आणि परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली होती. ही बाब सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली आणि कंपनीपर्यंत पोहोचली.

व्हायरल फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव सौरभ मोरे असे सांगितले जात आहे. त्याच्यासोबत व्हायरल झालेल्या पत्रात असे लिहिले होते की, "मी एचआरला कळवले आहे की माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला टीसीएसच्या बाहेर फूटपाथवर झोपण्यास आणि रहावे लागेल." त्याने सांगितले की त्याने २९ जुलै २०२५ रोजी टीसीएस सह्याद्री पार्क, पुणे कार्यालयात तक्रार केली होती, परंतु आतापर्यंत त्याचा आयडी अल्टीमॅट्रिक्स आणि टीसीएस सिस्टमवर सक्रिय झालेला नाही आणि त्याला पगारही मिळालेला नाही.

३१ जुलैपर्यंत पगार द्यावा लागणार होता

सौरभने पत्रात असेही लिहिले आहे की, ३० जुलै रोजी झालेल्या बैठकीत त्याला ३१ जुलैपर्यंत पगार मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु तसे झाले नाही. त्याने आरोप केला की, त्याची समस्या एचआरला सांगूनही कोणतीही मदत मिळाली नाही, ज्यामुळे तो २९ जुलैपासून ऑफिसबाहेर फूटपाथवर राहत आहे. हे पत्र आणि फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाले. @beingpunekarofficial नावाच्या अकाउंटने ते पोस्ट केले, ज्याला १५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले.

View post on Instagram

टीसीएसने दिले स्पष्टीकरण

ही बाब चर्चेत आल्यानंतर, टीसीएसने एचटी.कॉमशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. कंपनीने म्हटले आहे की, कर्मचाऱ्याचा पगार बराच काळ अनधिकृतपणे कामावरून गैरहजर राहिल्याने थांबवण्यात आला होता. पण आता सौरभने परत तक्रार केली आहे आणि त्याला पुन्हा सेवेत घेण्याची विनंती केली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "हे अनधिकृत गैरहजेरीचे प्रकरण आहे, ज्यामुळे मानक प्रक्रियेनुसार पगार स्थगित करण्यात आला. कर्मचारी आता कामावर परतला आहे आणि आम्ही त्याला सध्या राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. आम्ही त्याची परिस्थिती योग्य आणि रचनात्मक पद्धतीने सोडवण्यास मदत करत आहोत."

युझर्सच्या प्रतिक्रिया

टीसीएसच्या या विधानानंतर, सोशल मीडियावर चर्चा तीव्र झाली आहे. अनेक युझर्सने कंपनीला संवेदनशीलतेने हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. तर काहींनी कर्मचाऱ्याच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका युझर्सने इन्स्टावर लिहिले आहे की, "जर रतन टाटा असते तर हा दिवस आला नसता." दुसऱ्या युझर्सने लिहिले आहे की, "खरोखर! इतके वाईट कृत्य? एखाद्याला त्याचे वेतन न देणे!" दरम्यान, १२००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या घोषणेमुळे टीसीएस आधीच टीकेचा सामना करत आहे.