अंबाला गावातील आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात जेवणानंतर २८९ जणांना विषबाधा झाली. या दुर्घटनेत एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, अनेक जणांवर उपचार सुरू आहेत.

अंबाला गावात ठाकर आदिवासी समाजाच्या आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आनंदात पार पडला, मात्र नंतर घडलेल्या विषबाधेच्या प्रकाराने गावावर शोककळा पसरली. विवाहाच्या जेवणानंतर तब्बल २८९ जणांना विषबाधा झाली असून, सुरेश गुलाब मधे (वय ८) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

संगीता मेंगाळ (वय २५) यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. करंजखेडा, वडनेर व औराळा प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांना तातडीने दाखल करण्यात आले. ३२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे, तर ९१ रुग्णांना प्राथमिक उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या विवाहानंतर गाव व परिसरातील पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला होता. मात्र, शनिवारी दुपारी विषबाधेची लक्षणे दिसू लागली आणि परिस्थिती बिघडली.

डॉ. अनिरुद्ध गायकवाड, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरु केले. रविवारी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. कांचन वानोरे व डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अन्नातून विषबाधा नेमकी कशी झाली, याचा तपास सुरु आहे.