Mumbai Pune Expressway : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपलीन गॅस वाहणारा टँकर उलटल्याने मोठा धोका निर्माण झाला. गॅस गळतीमुळे खबरदारी म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
Mumbai Pune Expressway : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका गंभीर अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने गॅस गळती सुरू झाली. संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तात्काळ थांबवली असून संपूर्ण महामार्ग ठप्प झाला आहे.
बोगद्याच्या तोंडाशी टँकर पलटी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टँकर पुण्याहून मुंबईकडे जात असताना आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी टँकर थेट बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ पलटी झाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली, ज्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली.
गॅस गळतीमुळे स्फोटाचा धोका
प्रोपलीन गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणतीही ठिणगी किंवा हलकी चूकही मोठ्या स्फोटास कारणीभूत ठरू शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने आडोशी बोगदा परिसरात तात्काळ वाहतूक बंद करण्यात आली आणि संपूर्ण भाग सील करण्यात आला.
आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशन तसेच खोपोली येथील अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रात्री बारानंतर पुण्याकडील मार्गिकेवरील एका लेनवर मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र मुंबईकडे जाणारी मार्गिका पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
टँकर हटविणे अद्याप धोकादायक
अपघात होऊन अनेक तास उलटूनही गॅस गळती पूर्णपणे थांबवण्यात यश आलेले नाही. तज्ज्ञ पथकाकडून गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत टँकर हटविणे धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे आडोशी बोगदा परिसरातील मुंबई मार्गिका अद्याप बंद आहे.
वाहतूक विस्कळीत; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
या अपघातामुळे बोरघाट परिसरात दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. द्रुतगती महामार्गासह जुना मुंबई–पुणे महामार्गही काही प्रमाणात ठप्प झाला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.


