राज्यातील शिक्षकांनी आज (९ जुलै) विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘शाळा बंद’ आणि ‘सामूहिक रजा’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी आज (९ जुलै) 'शाळा बंद' आणि 'सामूहिक रजा' आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिक्षण, शाळा आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होतेय असा आरोप करण्यात आला आहे. याच कारणास्तव अ शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तर शिक्षण विभागानेही कठोर भूमिका घेतली आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आज राज्यभर शिक्षकांचे आंदोलन
महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. शाळा बंद ठेवून आणि सामूहिक रजा घेऊन शिक्षक शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्रहार शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, मुख्याध्यापक महामंडळ यांसह अनेक संघटना सहभागी होण्याची शक्यता आहे.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या काय?
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
अशैक्षणिक कामांतून मुक्तीची मागणी
मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांना मतदार यादी पुनरीक्षण (SIR),अन्य शासकीय काम सोपवले जात असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत अल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
शिक्षक अभियोग्यता परीक्षेतून सूट
सेवापूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना पुन्हा अभियोग्यता परीक्षा देण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा मुद्दा शिक्षकांनी उपस्थित केला आहे. तमिळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र आणि ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
संच मान्यता धोरणाविरोधात नाराजी
१५ मार्च २०२४ रोजी लागू करण्यात आलेल्या संच मान्यता धोरणामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. अनेक ठिकाणी तीन वर्गांसाठी एकाच शिक्षकावर जबाबदारी दिली जात आहे. यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
मुंबई आणि वर्ध्यात प्रमुख आंदोलन
आज मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे धरणे आंदोलन असणार आहे. तर वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतही शिक्षक संघटनांकडून निदर्शने आणि आंदोलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाचा कडक इशारा
शिक्षकांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ९ जुलै रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची खात्री करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
शाळा बंद ठेवल्यास वेतन कपात
आंदोलनात सहभागी होऊन शाळा बंद ठेवणारे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


