राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. यामुळे काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रायगडसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. ही स्थिती पुढील काही तास अशीच राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मुंबई, ठाणे, रागयडसाठी देखील IMD कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अतिमुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याशिवाय ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी अनावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाची जोर येत्या 6 जुलैपर्यंत वाढलेला राहणार असल्याचेही IMD ने म्हटले आहे.
घाटमाथा आणि विदर्भात रेड अलर्ट
हवामान खात्याकडून घाटमाथा आणि विदर्भासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा आहे. येथील नागरिकांनी दक्षता घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस
दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे, गोरेगाव येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पावसामुळे पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय पूर्व उपनगरांमध्येही सातत्याने पावसाच्या सरी कोसळत आहेत. आजही नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकलसेवा उशिराने
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिंवडी, वसई-विरारसह आजूबाजूच्या परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता. अशातच मध्य, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10-15 मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती आहे. तर हार्बर मार्गावर 5-10 मिनिटे उशिराने सुरू आहे.


