महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. राज्यातील बहुतांश भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने पावसाची तूट वाढत आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. बहुतांश भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने पावसाची तूट वाढत असून शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. पणकाही राज्यात सध्या पुरेश्या मुसळधार पावसाचा अंदाज नाही. याशिवाय राज्यातील 3 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणातील पावसाचा अंदाज
कोकण विभागातही पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी सध्या विशेष पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप कायम असल्याने नागरिकांसह शेतकरीही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल अपेक्षित नाही. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
पश्चिम महाराष्ट्रात उष्ण, दमट वातावरण
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांतही पावसाची उघडीप कायम आहे. घाटमाथ्यासह काही परिसरात दमट आणि उष्ण वातावरण जाणवत आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून पुढील काही दिवस तापमानात विशेष घट होण्याची शक्यता कमी आहे.
मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस तसेच वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र, अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने या भागातही पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विदर्भातील 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भात काही भागांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
राज्यातील बहुतांश भागांत सध्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पण पुरेश्या मुसळधार पावसाची शक्यतना नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. पावसाची स्थिती आणि हवामानातील बदल लक्षात घेता नागरिक व शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.


