कैलास मानसरोवर यात्रेवरून परतताना तिबेटमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांची सुखरूप सुटका झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर हे सर्वजण काठमांडूसाठी रवाना झाले असून, तिथून ते भारतात परतणार आहेत.
तिबेट : कैलास मानसरोवर यात्रा करून परतत असताना तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांची अखेर सुखरूप सुटका झाली आहे. हे सर्वजण काठमांडूच्या दिशेने रवाना झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजता या भाविकांच्या गटाने न्यालम चेक पोस्टमार्गे सागा सोडले आणि ते आता काठमांडूच्या वाटेवर आहेत.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली येथील हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. मात्र, परतीच्या प्रवासात ते सागामध्ये अडकून पडले. २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता काठमांडूहून भारतात परतण्यासाठी त्यांचे विमान होते, त्यामुळे वेळेत काठमांडूला पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे होते. ही माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयानेही तात्काळ मदत आणि सहकार्य देऊ केले.
मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतत असलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक तिबेटमधील सागा येथे अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केलेल्या हस्तक्षेपानंतर, सर्व भाविक आज सकाळी ६ वाजता न्यालम चेक पोस्ट मार्गे काठमांडूसाठी सुखरूप रवाना झाले आहेत."
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली भागातील हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेला गेले होते. परतीच्या प्रवासात ते सागामध्ये अडकले. २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता काठमांडूहून त्यांचे विमान असल्याने वेळेत पोहोचणे आवश्यक होते. ही माहिती मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला, आवश्यक मदत मिळवली आणि सर्व भाविकांचा सागा ते काठमांडूपर्यंतचा प्रवास सुरक्षित होईल याची खात्री केली."
संकटकाळात मिळालेल्या या तातडीच्या मदतीबद्दल सर्व भाविकांनी मुख्यमंत्री फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.
अचानक आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान
हे संकट २६ ऑगस्ट (बुधवार) रोजी तिबेट-नेपाळ सीमेवर आलेल्या विनाशकारी पुरामुळे निर्माण झाले. या पुरामुळे भोटे कोशी आणि त्रिशूली नदीच्या प्रणालीत पाणी, गाळ आणि मोठमोठे दगड वेगाने वाहून आले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला.
नेपाळ सध्या बुधवारी सकाळी रसुवा जिल्ह्यात आलेल्या मोठ्या पुराच्या परिणामांशी झुंज देत आहे. दरम्यान, नेपाळ पोलिसांनी शुक्रवारी देशात पुराचा नवा इशारा दिला असून, त्रिशूली भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 'द काठमांडू पोस्ट'च्या वृत्तानुसार, बुधवारी भोटेकोशी पुरामुळे मृतांचा आकडा ४७५ वर पोहोचला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, या भागातील रस्त्यांच्या पुनर्बांधणीसह सर्व प्रकारची कामे थांबवण्यात आली आहेत. नेपाळ पोलीस अधिकारी पी. चौधरी म्हणाले, "पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांना थांबवले जात आहे. बचावकार्यात गुंतलेली वाहने परत येत आहेत. सर्वांना तेथून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे. सर्व काम थांबले आहे. याहूनही मोठा पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे."
भूकंप आणि धरणफुटीनंतर नवा इशारा
आज सकाळी चीनच्या सिचुआन प्रांतात ५.१ तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर नेपाळमध्ये पुराचा इशारा देण्यात आला. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिशूली नदीची पाणीपातळी वाढण्याच्या धोक्यामुळे परिसरातील लोकांना पुन्हा एकदा सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरच्या हवाल्याने CGTN ने वृत्त दिले आहे की, नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील लाँगचांग शहराला भूकंपाचा धक्का बसला.
नेपाळ पोलिसांनी एक अलर्ट जारी करत म्हटले आहे की, तिबेटच्या बाजूचे एक धरण पुन्हा फुटले आहे. "तिबेटच्या बाजूला असलेले पाण्याचे धरण पुन्हा फुटल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा कर्मचारी, बचाव आणि मदत कार्यात गुंतलेले कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला तात्काळ सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी जाण्याची किंवा इतरांना सूचित करण्याची विनंती आहे," असे नेपाळ पोलिसांनी X वर पोस्ट केले आहे.


