- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert : ऐन गणतीच्या मोक्यावर राज्यात पावसाचा जोर वाढला, रायगड-रत्नागिरीत वादळी वाऱ्याची शक्यता
Maharashtra Rain Alert : ऐन गणतीच्या मोक्यावर राज्यात पावसाचा जोर वाढला, रायगड-रत्नागिरीत वादळी वाऱ्याची शक्यता
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला गेला आहे. ऐन गणपतीच्या मोक्यावर कोकण ते घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर वाचा हवामान खात्याचे अपडेट्स…

राज्यात पावसाचा जोर वाढला
राज्यात पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोर वाढणार आहे. या आठवड्यात गणपती बाप्पाचं आगमन घराघरात होणार आहे. मात्र त्याच वेळी बाप्पाच्या स्वागताला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आजपासून पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी हवामान अपडेट पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन केलं आहे.
कोकणात पावसाचा इशारा
रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यावेळी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील स्थिती
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल. काही ठिकाणी मुसळधार सरी तर काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळेल.
घाटमाथ्यावर पावसाची शक्यता
पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री घेऊनच घराबाहेर पडावे, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
विदर्भ- मराठवाड्यातील वातावरण
परभणी, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर येथे पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मात्र विदर्भात पुढील 48 तास पावसाचा अंदाज नाही. दमट हवामानामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. बाप्पाच्या आगमनानंतर या भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची चिंता कायम
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पाऊस होईल असा अंदाज आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे बरीच धरणं भरली असली तरी मराठवाड्यात पाऊस अजूनही अपुरा झाल्याने तिथल्या शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

