कोकण आणि मुंबई परिसरात उष्णतेची लाट कायम असून तापमान ४० अंशांपार गेले आहे. दरम्यान, ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Heatwave : कोकण आणि महामुंबई परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. या उष्णतेपासून दिलासा मिळण्याआधीच आता मान्सूनबाबतच्या नव्या अंदाजामुळे चिंता वाढली आहे. हवामान तज्ञांच्या मते, पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उष्णतेचा वाढता तडाखा
गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि महामुंबई परिसरात उष्णतेची लाट जाणवत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या भागांत तापमानाने चाळीशीचा आकडा ओलांडला आहे. हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांच्या मते, पुढील आठवडाभर उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे.
‘एल निनो’चा मान्सूनवर परिणाम
प्रशांत महासागरात ‘एल निनो’ विकसित होण्याची शक्यता असल्याने यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात सरासरीच्या सुमारे ९२ टक्के पावसाची शक्यता आहे.
मान्सून अंदाज: पावसात घट होण्याची शक्यता
हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, यंदा मान्सून काळात ९० ते ९५ टक्के पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. देशभरातील सरासरी पर्जन्यमान ८७० मिमी असताना, यंदा कमी पावसाची शक्यता ६६ टक्के असून सरासरी किंवा अधिक पावसाची शक्यता केवळ ३४ टक्के आहे.
महाराष्ट्रात पावसाचा असमतोल अंदाज
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मंगळवारीही तापमान चाळीशीच्या आसपास
पलावा येथे ४२ अंश सेल्सिअस, बदलापूर-मुंब्रा-दिवा येथे ४१ अंश, तर ठाणे-मुलुंड भागात ३९ अंश तापमानाची नोंद झाली. १४ एप्रिल रोजीही बहुतांश भागांत तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.


