TCS Nashik Case : TCS नाशिक प्रकरणानंतर आता इन्फोसिस पुण्यातही छळाच्या तक्रारींचा दावा समोर आला आहे. सोशल मीडियावरून सरकारकडे तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, टीसीएस या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
TCS Nashik Case : नाशिकमधील आयटी कंपनी TCS मध्ये सुरू असलेल्या कथित छळ प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता पुण्यातील इन्फोसिसमध्येही गंभीर आरोप समोर आले आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांना उद्देशून ट्वीट करत ‘छळ’ सुरू असल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
सोशल मीडियावरून सरकारला आवाहन
एका X (ट्विटर) युजरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांना टॅग करत इन्फोसिस BPM पुण्यातील प्रकल्पात महिलांवर छळ होत असल्याचा आरोप केला. या ट्वीटची दखल घेत मंत्री राणे यांनी “नोंद घेतली” असे उत्तर दिले असून आवश्यक असल्यास अधिक माहिती देण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे.
TCS नाशिक प्रकरणामुळे खळबळ
दरम्यान, नाशिकमधील TCS कंपनीतील आठ महिला आणि एका पुरुष कर्मचाऱ्यांनी मानसिक आणि लैंगिक छळाच्या तक्रारी केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी धर्मांतरासाठी दबाव, तसेच विशिष्ट धार्मिक प्रथा स्वीकारण्यास भाग पाडल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
टाटा सन्सकडून चौकशीचे आदेश
या आरोपांवर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी तीव्र प्रतिक्रिया देत प्रकरण ‘अत्यंत चिंताजनक’ असल्याचे म्हटले आहे. तसेच, सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
SIT कडून मुख्य आरोपीची ओळख
नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून निदा खानची ओळख पटवली आहे. तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी महिला कर्मचाऱ्यांना प्रेमसंबंधांच्या आमिषाने जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केले.
धार्मिक प्रथा स्वीकारण्याचा आरोप
तपासादरम्यान, पीडितांना नमाज अदा करणे, पोशाख बदलणे यांसारख्या धार्मिक प्रथा स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याचेही समोर आले आहे. या आरोपांमुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.


