राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी जर मी मुख्यमंत्री झालो तर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या अनुदानाऐवजी १ लाख रुपये देण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे.

Kolhapur: वाचाळवीर बोलणाऱ्या नेत्यांमुळं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ हे एका वादग्रस्त वक्तव्यामुळं परत एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी मी पुढेमागे कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन. शेतकऱ्यांना आता 50 हजार मिळत असतील तर मी ती रक्कम 1 लाख रुपये करेन, असं वक्तव्य केलं आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले? 

आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे वचन दिले आहे. पण सध्याची परिस्थिती थोडी अवघड आहे. लाडक्या बहि‍णींना 46 हजार कोटी रुपये द्यावे लागत आहेत. काही पुरुषांनीही लाडक्या बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे घेतले. आमची अडचण असली तरी आम्ही कर्जमाफी अनेकदा केली आहे. पण कर्जमाफीबाबत माझं मत वेगळं आहे. कर्जमाफी करणार म्हटलं की, शेतकरी कर्ज भरत नाहीत.

त्यामुळे बँका अडचणीत येतात. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे 38 हजार कोटी रुपये थकल्याचे मी ऐकले. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट पैसे दिले पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्यांना पैसे भरायची सवय लागेल. नाहीतर नुसती कर्जमाफी करत राहिले तर थकबाकीमुळे बँका बुडून जातील, असं मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच केलं अभिनंदन 

कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा मोठ्या प्रमाणावर केला असून त्यांचं मंत्र्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं. गेल्यावर्षी कोल्हापूरमध्ये कृषी कर्जाची वसुली 90 टक्के झाली होती, ती यंदा 91 टक्के झाली आहे. कोल्हापूरातील शेतकरी हिंमतवाला आहे, त्याला फुकटंच काही नको, त्याचा ऊस कारखान्यात जातो, तिथून पैसे सोसायटीत येतात, या लिकिंगच्या वसुलीमुळे कर्ज परतफेड होते. 

आम्हाला भीक नको, आम्हाला हक्काचं द्या, असं कोल्हापूराचं शेतकरी म्हणतो, म्हणून कर्जाची इतकी परतफेड झाली. पुढेमागे तुम्ही कधी मला या राज्याचा मुख्यमंत्री केले तर मी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन असं मुश्रीफ यांनी वक्तव्य केलं आहे.