Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा ‘धक्कातंत्र’ वापरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची मोठी रांग असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीत अनपेक्षित पावले उचलल्यानंतर, यावेळीही शिंदे ‘धक्कातंत्र’ वापरतील का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

12 मे रोजी मतदान, त्याच दिवशी निकाल

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. विशेष म्हणजे याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना (शिंदे गट) मध्ये उमेदवारीसाठी हालचाली वाढल्या आहेत.

नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी?

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्ष नेतृत्व त्यांना सातत्य देणार की नव्या चेहऱ्यांवर भर देणार, याबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

दुसऱ्या जागेसाठी इच्छुकांची ‘भाऊगर्दी’

शिवसेनेच्या दुसऱ्या जागेसाठी पक्षात इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांसारख्या अनेक नेत्यांनी आपली उमेदवारी पुढे केली आहे. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी अंतर्गत स्पर्धा तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

संख्याबळ मजबूत; निर्णय शिंदेंच्या ‘स्टाइल’वर अवलंबून

विधानसभेतील 57 आमदारांच्या बळावर शिवसेनेला दोन जागा जिंकण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, अनुभवी नेत्यांना संधी दिली जाईल की सामान्य शिवसैनिकांना पुढे आणले जाईल, हे पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या निर्णयशैलीवर अवलंबून असेल.

मंत्रिमंडळातही बदलाचे संकेत?

दरम्यान, पक्षात ‘भाकरी फिरवण्याची’ चर्चा देखील रंगली आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले असून, अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. धाराशिव आणि सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उद्रेक झाल्याने हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.