सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. या पत्रामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांवरून वाद निर्माण झाला असून, पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचं चित्र दिसत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांबाबत मोठा वाद निर्माण झाला असून निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाने निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे यांचा ‘प्रदेशाध्यक्ष’ म्हणून उल्लेख नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या पदाबाबतही संभ्रम निर्माण झाल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणे बदलत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

महत्वाचे निर्णय घेतले 

या पत्रानंतर पक्षातील नेतृत्वावरून संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्व बदलाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न काही वरिष्ठ नेत्यांनी केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे या नव्या पत्रामुळे त्या आरोपांना अधिक बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आगामी काळात होणार हे बदल 

प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरून दूर करण्यात आल्याच्या चर्चांनाही या घडामोडींमुळे वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नव्या अधिकृत पत्रातून पक्ष संघटनेत मोठे बदल सुरू असल्याचे संकेत मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील गटबाजी, नेतृत्व संघर्ष आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवार कोणते निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.