Monsoon Update : भारतीय हवामान विभागाने यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधी केरळात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो.
Monsoon Update : राज्यातील वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, यंदाचा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.

पुढील 48 तासांत अंदमानात मान्सूनसाठी पोषक परिस्थिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेट परिसरात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. 16 मेच्या आसपास मान्सून अंदमान परिसरात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनचा हा वेग कायम राहिल्यास तो नियोजित वेळेपेक्षा लवकर केरळात पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा
IMD ने दक्षिण भारतातील अनेक राज्यांसाठी पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, माहे आणि दक्षिण कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 13 ते 19 मे दरम्यान ईशान्य भारतात अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागांत ताशी 50 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा परिणाम
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या हालचालींना वेग मिळत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या वातावरणीय बदलांचा परिणाम देशातील हवामानावर पुढील काही दिवस स्पष्टपणे दिसून येणार आहे. हवामान खात्याच्या मते, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतेही मोठे चक्रीवादळ निर्माण झालेले नसल्याने मान्सूनचा प्रवास तुलनेने सुरळीत राहण्याची शक्यता आहे.
उष्णतेची लाट कायम; राजस्थानात तापमान 48 अंशांपार
एकीकडे पावसाची चाहूल लागली असली तरी देशातील अनेक भाग अजूनही उष्णतेच्या लाटेने होरपळत आहेत. उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात तापमानाचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे. राजस्थानमधील बारमेर येथे तब्बल 48.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. त्यामुळे नागरिकांना अद्याप काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
कोकण आणि पुण्यासाठीही आनंदाची बातमी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होऊ शकतो. त्यानंतर 6 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर आणि 7 जूनपर्यंत पुणे शहरात मान्सून पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेती हंगामासाठी तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


